lekhamrut.blogspot.com
ललितलेख, माहिती लेख, वर्णनात्मक लेख, कथा, काव्य इ. साहित्य प्रकारासाठी हा ब्लाॅगर तयार केला आहे. खात्री आहे प्रीय वाचकांना वाचुन नक्की समाधान लाभेल.
Thursday 21 February 2019
जगभरात हिंदू धर्माचा प्रभाव वाढतोय- रवीजी अय्यर
lekhamrut.blogspot.com
Sunday 10 February 2019
शाखा: व्यक्तीनिर्माणाचे केंद्र
शाखा: व्यक्तीनिर्माणाचे केंद्र
संघाच्या स्थापनेपासुन आतापर्यंत ९३ वर्षाच्या कालावधीत संघातुन वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक दिग्गज व्यक्ती संघाने देशाला दिल्या आहेत. संघाचे स्वयंसेवक आज सैन्यात दिसतील, क्रिडा क्षेत्रात दिसतिल, सामाजिक कार्य करणा-या अनेक संस्था संघटनांमध्ये दिसतील, सेवाकार्य करणा-या अनेक संस्थांमध्ये स्वयंसेवक आहेत, राजकिय नेत्यांमध्ये पंतप्रधान ते राष्ट्रपतींपासुन सरपंचापर्यंत संघाचे स्वयंसेवक दिसुन येतिल तसेच कला, विज्ञान, संशोधन व इतर अनेक क्षेत्रात स्वयंसेवकांचा समावेश आज दिसुन आल्याशिवाय राहत नाही. पण असे असताना संघाच्या शाखेतुन व्यक्तीनिर्माण कसे होते? या प्रश्नाविषयी अनेकांना जाणुन घ्यायची उत्सुकता असते. पण या प्रश्नाचे उत्तर मिळणे शाखेत गेल्यावाचुन समजणे अशक्य आहे. शाखा हा संघाचा आत्मा आहे. म्हणुन संघाच्या शाखेतुन होणारे व्यक्तीनिर्माण समजुन घेण्यासाठी संघाची एक तासाची शाखा समजुन घेतली पाहिजे.
शाखा लागण्याचा शिटी संकेत होताक्षणी गप्पागोष्टी, संघस्थान स्वच्छतेत वा अन्य काम करत असलेले स्वयंसेवक तात्काळ संघस्थानी गोळा होतात. मुख्यशिक्षकाच्या शिटी संकेताचे महत्व व शिस्त यावरुन लक्षात येऊ शकेल. शाखा लावणारा मुख्यशिक्षक हा शिशू, बाल किंवा तरुण असू शकतो. शाखेत शिशुपासुन ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत सर्व वयोगटातील स्वयंसेवक असतात. वैयक्तीक आयुष्यात त्यापैकी काहीजण डाॅक्टर असतिल, तर काही अधिकारी, काही प्राध्यापक तर काही शेतकरी. विविध क्षेत्रातील स्वयंसेवक शाखेत उपस्थित असतात. परंतु, एखादा गरीब घरातला व आपल्यापेक्षा वयाने लहाण असलेला बालक आपल्याला आज्ञा देतो याबद्दल कुणाच्या मनात कमीपणा येत नाही.
अग्रेसर म्हणुन पुढे जाताना स्वयंसेवक आपापसात न बोलता केवळ नजरानजर करुन काही क्षणात पुढे कोण जाणार, हे ठरवतात. त्यामध्ये स्वयंसेवकाचे वय, मान, प्रतिष्ठा, जातपात, श्रीमंती न बघता ज्याला कालपर्यंत संधी मिळाली नसेल व सगळ्यांमध्ये जो लहान आहे, त्यास संधी दिली जाते. यावरुन आपल्यापेक्षा लहाण असलेल्यांना, शोषित वंचितांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे हा संस्कार नकळत स्वयंसेवकांच्या मनावर घडत असतो.
तती सम्यक करताना व अग्रेसर सम्यक करताना स्वयंसेवक अतिशय सहजपणे एकमेकांना समांतर व सम्यक होतात. स्वयंसेवक स्वत: मागे-पुढे, डावीकडे-उजवीकडे सरकतात. अडून बसत नाही. यावरुन स्वयंसेवकांच्या मनात परिस्थितीशी जुळवून घेण्याची व तडजोड करण्याची वृत्ती निर्माण होते.
उपवीश: अशी आज्ञा आल्यानंतर सर्व स्वयंसेवक चटकन खाली बसतात. खाली बसायला आसन व चटयांची सोय नसते. मग कुणी किती मोठा व प्रतिष्ठेचा असला तरी तो सर्व स्वयंसेवकांप्रमाणे जमिनीवरच बसतो. त्याच्या मनात वेगळेपणाची भावना निर्माण होत नाही. यातुन समान न्यायाचा संदेश त्याच्या अंतर्मनात संस्कार करत असतो.
शाखेत खेळल्या जाणा-या खेळातूनही असेच संस्कार स्वयंसेवकांवर होत असतात. किंबहुणा संस्कार करणारेच खेळ शाखेत खेळले जातात. बुद्धीला चालना मिळणारे बौद्धीक खेळ व शारीरीक व्यायाम करवुन घेणारे खेळांना शाखेत विशेष प्राधान्य असते. सामुहिक खेळातुन एकतेच्या व संघटनात्मक शक्तीचा संदेश दिला जातो. 'भुताची गल्ली' सारख्या खेळातून आपल्यातली भीती लोप पाऊन धाडस निर्माण होते. 'गावगूंड'सारख्या खेळातून सज्जनांना दुर्जनांच्या तावडीतून सोडवण्याची नकळत संदेश मिळत असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खेळ खेळल्याने स्वयंसेवकांमधले नैराश्य, हताशपणा, संकुचितपणा, दु:ख लोप पाऊन उत्साह व आनंदाचा संचार होतो. काही खेळातून आपत्ती ओढवल्यावर समाजाप्रती धाऊन जाण्याचा संस्कार होत असतो. संपूर्ण समाजाप्रति असीम आत्मीयतेचा संस्कार त्यावर होत असतो. म्हणुनच कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकटांच्या वेळी स्वयंसेवक तत्परतेने सेवा कार्यात सहभागी होत राहिले आहेत. म्हणून RSS म्हणजे Ready for Selfless Service असे संघाचे वैचारिक विरोधकही मान्य करतात.
असे म्हणतात, देशातील तरुणपीढीच्या ओठावर कोणते गीत आहे यावरुन त्या देशाचा वर्तमान ठरत असतो. संघाच्या शाखेतील स्वयंसेवकांच्या ओठावर 'आम्ही गड्या डोंगरचं राहणारं, चाकर शिवबाचं होणारं' असं स्फुर्ती गीत, 'न हो साथ कोई अकेले बढो तुम सफलता तुम्हाके कदम चूम लेगी' असे प्रेरणा गीत, 'जिस दिन सोया राष्ट्र जगेगा, दिस दिस फैला तमस हटेगा' असे राष्ट्रजागृतीचा संदेश देणारे गीत तर आपणांस मिळालेले जीवन अमुल्य आहे, ते सन्मार्गाने व्यतित करण्याचा संदेश देणारे 'गलत मत कदम उठाओ सोचकर चलो विचार कर चलो, राह की मुसीबतों को पार कर चलो' असे गीत स्वयंसेवक सहज गुणगुणत असतात. ज्यामुळे त्यांच्या अंतर्मनावर संघ संस्कार घडत जातो. संघाच्या एक तासाच्या शाखेवर दररोज असे गीत म्हंटले जातात.
एक तासाच्या शाखेमध्ये खेळ खेळल्यानंतर बोधकथा, अमृतवचन व सुभाषित सांगितले जाते. ज्यामधून सुसंस्कृत व देशहिताचा विचार करण्यास प्रवृत्त करणारे विचार मांडले जातात. महापुरुषांचे व साधू-संतांचे विचार अमुतवचनातुन तर साधू संतांचे विचार व श्लोक सुभाषितातून धार्मिक संस्कार करत असतात. ज्यामुळे व्यक्तीमध्ये सर्जनशीलता, परोपकार, सदाचारी वृत्ती निर्माण होते. शाखेच्या शेवटी होणारी संघाची प्रार्थना त्या स्वयंसेवकास आपण एक तासाची शाखा लावतो, म्हणजे नेमकं काय करतो? याची मीमांसा करत त्याचे स्वयंसेवक म्हणुन 'परम वैभवम् नेतुमेतत् स्वराष्ट्रम्' हे ध्येय त्याच्या मनावर कोरले जाते. हे ध्येय ज्याला कळलं तो त्याला योग्य वाटेल त्या दिशेने ध्येयपथाकडे वाटचाल करतो.
संघाचा संस्कार झालेली व्यक्ती मग राष्ट्र व समाजहितासाठी शक्य ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याविना राहत नाही.
संघाची स्थापना १९२५ साली झाली. संघप्रारंभीच्या २५ वर्षांपर्यंत, केवळ संघटनेसाठी संघटन, संघटनेशिवाय दुसरे काहीही नाही, याचा आग्रह राहिला होता. परंतु, समाजाचे स्वरूप खूपच सरमिसळ असते. त्यात विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कलाकार, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, शिक्षातज्ज्ञ, सुरक्षा कर्मचारी, व्यापारी, इतर कर्मचारी अशा अनेक श्रेणी असतात. म्हणून, संघकार्यासाठी आवश्यक पाया तयार झाल्यावर, १९५० पासून संघाच्या योजनेनुसार स्वयंसेवक विविध क्षेत्रात जाऊन, समाजजीवनाच्या एका विशिष्ट क्षेत्रात राष्ट्रीय विचारांवर आधारित संघटन उभे करण्यासाठी जाऊ लागले. संघाचे क्रमश: विकसित (progressive unfoldment) होण्याचे हे पहिले चरण होते. श्री गुरुजींनी विविध क्षेत्रात सक्रिय झालेल्या या स्वयंसेवकांना, क्रमशः त्या क्षेत्रातील संघाचे गटनायक, राजदूत तसेच सेनापती म्हटले. आज ३५ हून अधिक संघटनांच्या माध्यमातून स्वयंसेवक शिक्षण, कृषी-शेतकरी, विद्यार्थी, श्रमिक-कामगार, इतिहास, कला, आर्थिक, क्रीडा, सहकार क्षेत्र, आरोग्य, वकील, विज्ञान, दिव्यांग, सेवा, सीमा सुरक्षा, सुरक्षा, वैचारिक इत्यादी अनेक क्षेत्रात केवळ सक्रियच नाही तर अग्रेसर आहेत. या सर्व संघटना एकाच राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असल्या तरी, स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. या संघटना संघाचा भाग किंवा शाखा नाहीत. तरीही कार्य मात्र संघाच्या संस्कारांनी प्रेरित होऊन करत असतात. भारतमातेला परम वैभवास नेण्यासाठी झटत असतात. हा व्यक्तीनिर्माणाचा अविष्कार एक तासाच्या संघाच्या शाखेमुळे शक्य होत असतो.
©कल्पेश जोशी
lekhmrut.blogspot.com
Friday 18 January 2019
देशास पत्र
प्रिय भारत देश,
पत्र लिहण्यास कारण की, मला तुझ्यावर होणा-या आघातांची व संकटांची वित्तंबातमी दररोज मिळत असते. घडणा-या गोष्टींमुळे तुला काय यातना होत असतिल याची जाणिवही आहे मला. रोज कुठे ना कुठे होणारे आंदोलनं, मोर्चे, जाळपोळ व अधून मधून होणा-या जातीय दंगली यामुळे तू कायमच अस्वस्थ असतोस ह्याचीही कल्पना आहे. कधी कधी तर तमा न बाळगता तुझ्या नाशाच्या व तुझ्या अखंडत्वाला सुरुंग लावण्याच्या आरोळ्या, किंकाळ्या व घोषणा ऐकू येतात त्यामुळे तुझ्या सन्मानाचा कडेलोट झाल्याचा आभास होतो. यामुळे मन विषण्ण होते.
या सर्व प्रकारामुळे तू फार दु:खी होत असशिल हे ठाऊक आहे. म्हणुनच न राहवुन तुझ्या भूतकाळातील वैभवशाली रूपाची अतिशय आठवण येत आहे. ज्याप्रमाणे तुझ्या भौगोलीक रूपात कालानुरुप बदल होत गेला, तसाच बदल तुझ्या राजकिय - सांस्कृतिक रुपातही होत गेला. परंतु तू अमर आहेस, अटळ आहेस हे सिद्ध झाले आहे. तुझ्या पोटी नरवीर जन्मास आले. ज्यांनी तुझ्यावरील सर्व संकटांना पाताळात गाडून टाकले. आम्हा आजच्या तुझ्या लेकरांस तुझा फार पुर्वीचा इतिहास नाही माहित. पण, जसजशी आम्हास स्वर्णाक्षरात लिहिलेली, तुझ्या कौतुकाने पावन झालेली विविध ग्रंथसंपदा वाचावयास मिळते, तसतसे आम्ही तुझ्या गौरवाने व किर्तीने प्रभावित होतो.
आम्हास वाचावयास मिळते ते 'रामायण'. ज्यामध्ये क्षत्रिय राजकुमाराने आपला पुत्रधर्म यथासांग पाळत मानवजातीस छळणा-या दुष्ट रावणाचा वध करून क्षत्रियधर्मही यशस्वीपणे पाळला. एक बाणी, एक पत्नी व एकवचनी अशी किर्ती असलेल्या श्रीरामचंद्राने आपल्या मातृभूवरील रावणरुपी संकट नष्ट करुन टाकले. आम्हास वाचावयास मिळतो महाभारत ग्रंथ. ज्यामध्ये पांडव-कौरवरुपातून साक्षात धर्म व अधर्माच्या युद्धात नेहमी धर्माचाच विजय होतो असा संदेश मिळाला. देशावरील अधर्माचे वाढते काळेकुट्ट मेघ दूर सारून श्रीकृष्णरुपी स्वच्छ निर्मळ सुर्यप्रकाशातून मानवजातीस नवसंजीवनी देण्यासाठी अर्जुनरुपी मानवास मिळालेला पवित्र गीता ग्रंथही ओघाने आठवतोच. एवढेच काय तर अगदी अडीच हजारवर्षापुर्वी या पुण्यभूवर मानवा मानवामध्ये संपत्ती व धनदौलतीच्या लालसेवरून, साम्राज्यवादावरून उठलेल्या रक्तपाताच्या प्रलयंकारी हिंसाचारांपासून भगवान बुद्ध व भगवान महावीरांसारख्या पुण्यात्म्यांनी सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवला व या मातृभूवरील रक्ताच्या वाहणा-या नद्या नाहिश्या केल्या. मानवतेचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापीत झाले. सर्वदूर आनंद व सुखाचे वातावरण तयार झाले. हा गौरवशाली इतिहास जेव्हा आमच्या मन:पटलावर तरळू लागतो, तेव्हा तुझ्या अभिमानाने ऊर भरून येते.
हे भारत देशा... पण आज तुझ्याकडे पाहून तू फार गहन चिंतेत असल्यासारखा का भासतो रे? मला माहितीये तुला कसल्या चिंतेने वेढले आहे? मला माहितीये तू असा निस्तेज का झाला आहेस? पण हे भारत देशा, तुझा तुझ्या लेकरांवर विश्वास राहिलेला नाही का रे? अरे ही श्रीराम, श्रीकृष्ण, महावीर व गौतम ही तर अगदी मोजकीच उदाहरणे आहेत बघ. पण या महात्म्यांसारखीच कित्येक महापुरुष व राष्ट्रपुरुष या भूमीवर जन्मास आले होते, त्यांची गणना कशी करावी? तू त्यांना विसरलास की काय? अरे... काळ्याभोर अवकाशातील चमकणा-या चांदण्या कधी मोजता आल्या आहेत काय? तुझ्या कुशीतसुद्धा अशीच अनंत वीररत्ने उपजली व निसर्गनियमाप्रमाणे कालवश झाली. पण त्यांच्या मुखी मरणपुर्व 'तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण' अशी अमरकाव्ये स्फुरली होती. अख्ख्या जगावर स्वत:चे राज्य प्रस्थापीत करण्याच्या उद्देशाने तुझ्या दिशेने एक वादळ घोंघावत येत होतं, तेव्हा पोरस व दस्युसारखी तुझी वीरपुत्र त्याचा कर्दनकाळ ठरली होती. तू हे भूललास तर नाही ना? तुझ्यावर झालेल्या परकिय आक्रमणात तक्षशिला व नालंदासारख्या तत्कालीन विद्यापीठातून रक्ताचं पाणी करुन लिहिलेली ग्रंथसंपदा परकिय नरपिशाच्चांनी जाळून भस्मसात करुन टाकली होती. पण म्हणुन तुझ्या पोटी जन्मलेल्या विद्वान पंडीतांची विद्वत्तता कधीच लुप्त होऊ शकली नाही. अरे...आम्हा मानवास आजकाल त्याचेदेखिल पुरावे लागतात, पण तू तर स्वत: ते अनुभवले आहेस. तेव्हा तू तरी त्या थोर विद्वानांचा अपमान होऊ देऊ नकोस. तुझ्यावर भलेही अनेक विध्वंसक धार्मिक आक्रमणं झाली असतिल, राजकिय आक्रमणं झाली असतिल. पण तुझ्या लाडक्या चंद्रगुप्ताने, राणासंगाने, महाराणा प्रतापाने, शिवाजीने व बाजीरावासारख्या महापराक्रमी वीर योद्धांनी आपल्या जीवाची बाजी लावुन त्या विषारी सर्पांपासून तुला मुक्ती दिलीच ना? मग आज का असा चेहरा पाडून बसला आहेस?
हे भारत देशा, तुला एवढी चिंताग्रस्त व्हायची काही गरज नाही. आजच्या वाढत्या हिंसाचाराने, तुझ्याच लेकरातील आपसी भांडणांमुळे, जातीभेदामुळे व धार्मिक कटूतेमुळे तू व्यथीत झालेला असला तरी काळजी करु नकोस. ह्या समस्या सुद्धा जास्त काळ टिकणार नाहीत. खरं तर तू तुझा जगभरात वाढत चाललेला गौरव व किर्तीमूळे आनंदी व्हावयास हवे. जातीभेद व अस्पृश्यतासारख्या दुर्गूणांचा शेवट तेव्हाच व्हायला सुरुवात झाली होती, जेव्हा तुझा लाडका 'भीमराव' व 'ज्योतीबा' जन्मास आले होते. तुझी किर्ती अख्ख्या विश्वात उज्ज्वल व्हावी म्हणुन नव्वद वर्षापूर्वी एका महापुर्षाच्या डोक्यात अभिनव कल्पना सुचली होती व त्याने ती वास्तवात आणली. आज त्याच व्यक्तीच्या मस्तिष्कात फुललेल्या विचारांवर निस्वार्थी भावनेने राष्ट्रासाठी तन-मन-धनपुर्वक 'राष्ट्राय स्वाहा इदं न मम्' असे व्रत घेऊन सेवा अर्पण करण्यासाठी लाखो भारतीय स्वत:ची जात, धर्म, पंथ विसरून तुझ्याच सेवेत एकरूप होताहेत. हे तू डोळे उघडून पहावयास हवे. तुला त्या सर्वांचा सार्थ अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही. 'अब्दूल कलाम' नामक तुझा असाच एक महाविद्वान सुपूत्र होऊन गेला ना? तू तर त्याला नक्कीच विसरला नसशिल. कारण त्यानेच तर तुला तुझ्या संरक्षणासाठी मोठाले क्षेपणास्त्रे तयार करुन दिलेत. तुझं नेतृत्व करणारा तो एक कुशल व यशस्वी राष्ट्रपती होऊन गेला. तुला परम वैभवाकडे वेगाने मार्गक्रमण करता यावं म्हणुन त्यानेच तुला 'अग्नीपंख' दिलेत. त्या अग्नीपंखात प्राण भरण्यासाठी आम्ही सारे भारतीय सदैव तत्पर आहोत हे विसरु नकोस. आम्हा भारतीयांमध्ये आपापसात काही मतभेद जरूर असतिल, पण राष्ट्रासाठी व राष्ट्रसंरक्षणासाठी आम्ही सारे भेदाभेद विसरुन एकरुप होतो, याचे का कमी दाखले आहेत?
हे भारत देशा, केवळ तुझ्या वैभवासाठी आजपर्यंत अगणित वीरांनी व वीरांगणांनी आपल्या जीवाचे रान करुन प्रसंगी प्राण देऊन तुझी प्रतिष्ठा टिकवुन ठेवली आहे, ती पुढेही तशीच सदैव तेजोमय राहिल याची खात्री बाळग. तुझ्यासाठी हौतात्म्य पत्करलेली सर्व पुण्यात्मे वर दूर अवकाशात जाऊन चांदण्यांच्या रुपात विराजमान झाली आहेत. ती सारी तुला अवकाशातुन दररोज न्याहाळत असतात. तू जर असा हताश व निराश झालास, तर त्यांच्या काळजास घरे पडतील रे. तुझी आजची वैभव संपन्नता पाहून त्यांनाही तुझ्याकडे झेप घ्यावीशी वाटते. तुझ्या कुशीत येऊन उतरावे वाटते. त्यासाठी ते अजुनही मरणांत मरण पत्करतात व तुझ्याकडे प्रेमपुर्ण भावाने झेपावतात. चांदण रात्री जी तारे तुटताना दिसतात त्याचा अजुन काय अर्थ लावावा? तुझ्या प्रेमात व भक्तीत आम्ही सदैव तल्लीन असू याची खात्री बाळग. म्हणुन हे भारत देशा...तुझ्या येणा-या सुवर्णवैभवाला आलींगन देण्यासाठी प्रसन्न चित्ताने सज्ज हो. आम्हास त्याच सुवर्ण क्षणांची आस लागुन आहे. भारता...सर्व बळ एकवटून तुझ्या गतवैभवाच्या सिंहासनाकडे भरारी घे व जगज्जेता हो.
तुझा प्रिय,
कल्पेश
lekhamrut.blogspot.com