Thursday 21 February 2019

जगभरात हिंदू धर्माचा प्रभाव वाढतोय- रवीजी अय्यर

जगभरात हिंदू धर्माचा प्रभाव वाढतोय- रवीजी अय्यर

१६ फेब्रुवारी, जळगांव: शनिवार रोजी जळगांवातील छ. संभाजी महाराज नाट्यगृहात 'हिंदूत्वाचा जगभरातील वाढता प्रभाव' या विषयावर रविकुमार अय्यर यांचे बौद्धिक ऐकण्याचा योग जळगांवकरांना आला. रविकुमार मागील काही वर्षापासुन जगभर हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीसंबंधी भ्रमंती करत आहेत. तसेच जनजाती समाजातही त्यांनी काही वर्ष सेवाकार्य केले असुन सध्या रा.स्व. संघाच्या केंद्रिय संपर्क मंडळातील ते सदस्य आहेत. या कार्यक्रमप्रसंगी त्यांचे 'इंडोनेशियातील हिंदुत्वाचे पुनरुत्थान' नामक पुस्तकाचे महेश त्रिपाठी यांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले. सवलतीच्या दरात ते पुस्तक उपलब्ध करण्यात आले होते.

रविकुमार यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत केली. शिवरायांनी नेताजी पालकरांना स्वधर्मात पुन: घेऊन हिंदूंना शुद्धीबंदीच्या जोखडातून मुक्त केल्याचे त्यांनी म्हंटले. त्यामुळे हिंदू समाजावर शिवरायांचे अनंत उपकार आहेत व त्यांच्या या विचारांना आपण विसरता कामा नये असेही ते म्हणाले.

तसेच, मुळ विषयास सुरुवात करण्यापुर्वी जळगांव व खान्देशच्या वैशिष्ट्य असलेल्या सुवर्ण व्यापार व केळी उत्पादनाचा उल्लेख करत खान्देशचे खरे रत्न कवयित्री बहिणाबाई चौधरी आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. जळगांवच्या महापौर सौ. सिमा भोळे यांनी बहिणाबाईंविषयक एक पुस्तक भेट म्हणुन दिले, ते वाचुन बहिणाबाईंच्या कार्याचा खरोखर अभिमान वाटला. जळगांवच्या विद्यापीठाला त्यांचे नाव देऊन ख-या अर्थाने एका महिलेचा गौरव केला गेला असल्याचे ते म्हणाले. विद्यापीठास महिलांचे नाव फक्त आपल्या भारतातच दिसू शकते. अन्य कोणत्याही देशात महिलेच्या नावाने विद्यापीठे नाहीत. त्यामुळे भारतातील स्त्रीसन्मानाचा आपणांस सार्थ अभिमान वाटतो असे ते यावेळी म्हणाले.

पुलवामा हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त करत ही घटना जरी सर्व भारतीयांसाठी दुखद असली तरी भारत महासत्ता होण्याकडे वेगाने पुढे जात आहे. भारताची पाकिस्तान व चीन सोबत युद्धे झाली आहेत. पण तत्कालीन परिस्थितीत आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत प्रभावी ठरत नव्हता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकिय दबावामुळे अनेकदा भारताला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आहे. १९७१ च्या युद्धात अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी पानबुडी पाठवली होती. आज तोच अमेरिका पाकिस्तानच्या विरोधात व भारताच्या बाजूने उभा दिसत आहे. पुलवामा हल्ल्यापश्चात अमेरिकेसह रशिया व इस्त्राईलने भारताला पाठिंबा दर्शवलाय हे देशाच्या प्रगतीचे व वाढत्या शक्तीचे सुचिन्ह म्हंटले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

भारतावर मागील हजारो वर्षापासुन अनेक परकियांनी आक्रमण केले. अनेक परकिय भारतात आले व इथेच स्थायिक होऊन भारतीय संस्कृतीत मिसळून गेले. हिंदू संस्कृतीने त्यांना मोठ्या मनाने स्विकारले. परंतु इस्लामीक आक्रमणाबाबत असे घडले नाही. त्यामुळेच सिंध इस्लाममय होऊन गेला. त्यामुळे हिंदूंचे पुनरुत्थान होण्यासाठी त्या त्या प्रदेशातील परधर्मात गेलेल्यांना आपल्या स्वत्वाची भावना जागृत करुन द्यावी लागेल व मोठ्या मनाने त्यांना स्विकारावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

आपल्या देशाचे बौद्धीक वैभव परकियांनी चोरुन आपल्या नावावर खपवल्याचा दाखला देत त्यांनी लिनक्स व न्युटनच्या 'कॅलकुलस'च्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की काही वर्षापुर्वी न्युटन व लिनक्स यांच्यात कॅलकुलसच्या शोधावरुन वाद सुरु होता. लिनक्सच्या मृत्युनंतर न्युटनने ते आपल्या नावे केले. परंतु त्या दोघांच्याआधी कॅलक्युलसची निर्मिती कोणी केली हे कधी बाहेर आले नाही. त्याची निर्मिती आपल्या मराठवाड्यातील गणितज्ञ भास्कराचार्यांनी केली होती, असे त्यांनी सांगितले. तसेच ब्रम्हेंद्रस्वामी 'फादर आॅफ कोआॅपरेटीव्ह मोमेंट' तर सारंगदेव संगितक्षेत्रातील महान तज्ञ असुन आपणांस त्यांच्या अलौकीक कार्याविषयी माहिती असली पाहिजे असे ते म्हणाले.

हिंदुत्वाविषयी बोलताना रविकुमारजी पुढे म्हणाले, आज जगभरात भारत व हिंदूत्वाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे व लोक वेगाने हिंदू धर्माकडे आकर्षित होत आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी अबुधाबीत हिंदू मंदिराचा शिलान्यास केला असुन त्यासाठी तेथिल मुस्लीम युवराज पुढाकार घेतो, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. पु. मुरारी बापु अबुधाबीत गेले तेव्हा तेथिल युवराजाच्या पत्नीने रामायण ग्रंथास आपल्या डोक्यावर ठेवून सभामंडपापर्यंत घेऊन गेल्या. तसेच तेथिल युवराजांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'जय सिया राम' म्हणुन केली होती याची आठवण त्यांनी यानेळी करुन दिली. त्यामुळे या उदाहरणांनरुन आपल्या लक्षात येईल की जगभरात हिंदूत्वाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. लोक धर्मांधता व कट्टरतापासून दूर जात आहे. लोकांना हिंदू धर्माचे व गीतेचे तत्वज्ञान जास्त तर्कशुद्ध व योग्य वाटत असल्यामुळे तसेच कट्टरतेच्या बेड्या नसल्यामुळे सर्व मानव जातीस आपला मानणारा व 'वसुधैव कुटुंबकम' असा मंत्र देणारा हिंदू धर्म आपलासा वाटू लागला आहे. रशियात आजपर्यंत ५ लाख लोकांनी हिंदू धर्म स्विकारला असुन त्यांना स्विकारण्यासाठी व त्यांच्या स्वागतासाठी आपण सज्ज असले पाहिजे. असे त्यांनी सांगितले.

इंडोनेशिया हा मुस्लीम देश असुनही तेथिल लोकांचा श्रीराम व रामायणावर प्रचंड विश्वास आहे. तेथिल लोक श्रीरामाची पुजा करतात. त्यांच्या चलनावर गणपतीचे चित्र असुन संस्कृत भाषेतील काही अक्षरे त्यांच्या चलनावर छापली असल्याचे त्यांनी सांगितले. जावा द्वीपावरही अशीच परिस्थिती आहे. आॅस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका, इंडोनेशिया, जावा, रशिया इ. देशामध्ये हिंदू संस्कृतीचा स्विकार वेगाने होत असून त्यांना आपल्यात सामावुन घेण्यासाठी आपण उदार अंत:करणाने त्यांचे स्वागत करण्याची वेळ आली आहे. 

पुढील १५ ते २० वर्षात हेच प्रमाण अजुन वाढलेले असेल, त्यामुळे ही आपणा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. असे सांगुन त्यांनी आपल्या वाणीस विराम दिला.

हिंदू धर्माचा जगभरातील वाढता प्रभाव ऐकुन श्रोत्यांच्या चेह-यावर आनंद ओसांडून वाहत होता. हजारोंच्या संख्येने जळगांवकर या कार्यक्रमास उपस्थित होते. 

©️कल्पेश जोशी
lekhamrut.blogspot.com

Sunday 10 February 2019

शाखा: व्यक्तीनिर्माणाचे केंद्र

             

                शाखा: व्यक्तीनिर्माणाचे केंद्र


     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा म्हंटली की आठवते ती प्रार्थना, संघाचे पथसंचलन, शाखेत होणारे खेळ व ध्वजाचा प्रणाम घेणारे स्वयंसेवक. परंतु, केवळ ही काही शाखेची ओळख होऊ शकेल काय? शाखा म्हंटल्यानंतर डोळ्यासमोर वरील बाबी तरळत असतिलही, परंतु शाखा ओळखली जाते ती त्या शाखेतील स्वयंसेवकांच्या चारित्र्यावरून व कार्यावरुन. शाखेत नियमीत जाणा-या स्वयंसेवकाच्या नेत्रपटलावर देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी महापुरुषांची व राष्ट्रपुरुषांची चरित्रे व त्यांचे विचार तरळत असतात. शाखेत गेलं म्हणजे पाच मिनिटाच्या बोधकथेमध्ये ही महापुरुषांनी व राष्ट्रपुरुषांनी सांगितलेली मूलतत्वे व संघाचे संस्कार त्या स्वयंसेवकाच्या मन:पटलावर परिणाम करत असतात. त्याच हृदयाच्या पावन बागेमध्ये नंदनवन तयार होणं म्हणजे 'व्यक्ती निर्माण' होणं असतं. कारण याच नंदनवनातून परोपकाराची, मानवतेची, राष्ट्रीयत्वाची, देशसेवेची व समाजसेवेची फुले उमलतात व त्यांचा सुगंध समाजात स्वयंसेवकाच्या कार्यावरून व कर्तृत्वावरून दरवळत जातो. हा सुगंध कुण्या एका व्यक्तीचं नव्हे तर समस्त समाजाचं मन प्रफुल्लीत करण्यासाठी कारणीभूत ठरतो. समाज जर प्रफुल्लीत व चेतनायुक्त असेल तर कोणतेही राष्ट्र कधीही प्रगतीपासुन वंचित राहू शकणार नाही. म्हणुन राष्ट्राच्या प्रगतीचा विशाल वृक्ष होण्यासाठी एक कोंब व राष्ट्राला तेजोमय करणारा एक तेजकिरण संघाच्या शाखेतून स्वयंसेवकाच्या रुपातून बाहेर पडत असतो.



     संघाच्या स्थापनेपासुन आतापर्यंत ९३ वर्षाच्या कालावधीत संघातुन वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक दिग्गज व्यक्ती संघाने देशाला दिल्या आहेत. संघाचे स्वयंसेवक आज सैन्यात दिसतील, क्रिडा क्षेत्रात दिसतिल, सामाजिक कार्य करणा-या अनेक संस्था संघटनांमध्ये दिसतील, सेवाकार्य करणा-या अनेक संस्थांमध्ये स्वयंसेवक आहेत, राजकिय नेत्यांमध्ये पंतप्रधान ते राष्ट्रपतींपासुन सरपंचापर्यंत संघाचे स्वयंसेवक दिसुन येतिल तसेच कला, विज्ञान, संशोधन व इतर अनेक क्षेत्रात स्वयंसेवकांचा समावेश आज दिसुन आल्याशिवाय राहत नाही. पण असे असताना संघाच्या शाखेतुन व्यक्तीनिर्माण कसे होते? या प्रश्नाविषयी अनेकांना जाणुन घ्यायची उत्सुकता असते. पण या प्रश्नाचे उत्तर मिळणे शाखेत गेल्यावाचुन समजणे अशक्य आहे. शाखा हा संघाचा आत्मा आहे. म्हणुन संघाच्या शाखेतुन होणारे व्यक्तीनिर्माण समजुन घेण्यासाठी संघाची एक तासाची शाखा समजुन घेतली पाहिजे.

     शाखा लागण्याचा शिटी संकेत होताक्षणी गप्पागोष्टी, संघस्थान स्वच्छतेत वा अन्य काम करत असलेले स्वयंसेवक तात्काळ संघस्थानी गोळा होतात. मुख्यशिक्षकाच्या शिटी संकेताचे महत्व व शिस्त यावरुन लक्षात येऊ शकेल. शाखा लावणारा मुख्यशिक्षक हा शिशू, बाल किंवा तरुण असू शकतो. शाखेत शिशुपासुन ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत सर्व वयोगटातील स्वयंसेवक असतात. वैयक्तीक आयुष्यात त्यापैकी काहीजण डाॅक्टर असतिल, तर काही अधिकारी, काही प्राध्यापक तर काही शेतकरी. विविध क्षेत्रातील स्वयंसेवक शाखेत उपस्थित असतात. परंतु, एखादा गरीब घरातला व आपल्यापेक्षा वयाने लहाण असलेला बालक आपल्याला आज्ञा देतो याबद्दल कुणाच्या मनात कमीपणा येत नाही.

     अग्रेसर म्हणुन पुढे जाताना स्वयंसेवक आपापसात न बोलता केवळ नजरानजर करुन काही क्षणात पुढे कोण जाणार, हे ठरवतात. त्यामध्ये स्वयंसेवकाचे वय, मान, प्रतिष्ठा, जातपात, श्रीमंती न बघता ज्याला कालपर्यंत संधी मिळाली नसेल व सगळ्यांमध्ये जो लहान आहे, त्यास संधी दिली जाते. यावरुन आपल्यापेक्षा लहाण असलेल्यांना, शोषित वंचितांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे हा संस्कार नकळत स्वयंसेवकांच्या मनावर घडत असतो.

     तती सम्यक करताना व अग्रेसर सम्यक करताना स्वयंसेवक अतिशय सहजपणे एकमेकांना समांतर व सम्यक होतात. स्वयंसेवक स्वत: मागे-पुढे, डावीकडे-उजवीकडे सरकतात. अडून बसत नाही. यावरुन स्वयंसेवकांच्या मनात परिस्थितीशी जुळवून घेण्याची व तडजोड करण्याची वृत्ती निर्माण होते.

     उपवीश: अशी आज्ञा आल्यानंतर सर्व स्वयंसेवक चटकन खाली बसतात. खाली बसायला आसन व चटयांची सोय नसते. मग कुणी किती मोठा व प्रतिष्ठेचा असला तरी तो सर्व स्वयंसेवकांप्रमाणे जमिनीवरच बसतो. त्याच्या मनात वेगळेपणाची भावना निर्माण होत नाही. यातुन समान न्यायाचा संदेश त्याच्या अंतर्मनात संस्कार करत असतो.

     शाखेत खेळल्या जाणा-या खेळातूनही असेच संस्कार स्वयंसेवकांवर होत असतात. किंबहुणा संस्कार करणारेच खेळ शाखेत खेळले जातात. बुद्धीला चालना मिळणारे बौद्धीक खेळ व शारीरीक व्यायाम करवुन घेणारे खेळांना शाखेत विशेष प्राधान्य असते. सामुहिक खेळातुन एकतेच्या व संघटनात्मक शक्तीचा संदेश दिला जातो. 'भुताची गल्ली' सारख्या खेळातून आपल्यातली भीती लोप पाऊन धाडस निर्माण होते. 'गावगूंड'सारख्या खेळातून सज्जनांना दुर्जनांच्या तावडीतून सोडवण्याची नकळत संदेश मिळत असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खेळ खेळल्याने स्वयंसेवकांमधले नैराश्य, हताशपणा, संकुचितपणा, दु:ख लोप पाऊन उत्साह व आनंदाचा संचार होतो. काही खेळातून आपत्ती ओढवल्यावर समाजाप्रती धाऊन जाण्याचा संस्कार होत असतो. संपूर्ण समाजाप्रति असीम आत्मीयतेचा संस्कार त्यावर होत असतो.  म्हणुनच कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकटांच्या वेळी स्वयंसेवक तत्परतेने सेवा कार्यात सहभागी होत राहिले आहेत. म्हणून RSS म्हणजे Ready for Selfless Service असे संघाचे वैचारिक विरोधकही मान्य करतात.





     असे म्हणतात, देशातील तरुणपीढीच्या ओठावर कोणते गीत आहे यावरुन त्या देशाचा वर्तमान ठरत असतो. संघाच्या शाखेतील स्वयंसेवकांच्या ओठावर 'आम्ही गड्या डोंगरचं राहणारं, चाकर शिवबाचं होणारं' असं स्फुर्ती गीत, 'न हो साथ कोई अकेले बढो तुम सफलता तुम्हाके कदम चूम लेगी' असे प्रेरणा गीत, 'जिस दिन सोया राष्ट्र जगेगा, दिस दिस फैला तमस हटेगा' असे राष्ट्रजागृतीचा संदेश देणारे गीत तर आपणांस मिळालेले जीवन अमुल्य आहे, ते सन्मार्गाने व्यतित करण्याचा संदेश देणारे 'गलत मत कदम उठाओ सोचकर चलो विचार कर चलो, राह की मुसीबतों को पार कर चलो' असे गीत स्वयंसेवक सहज गुणगुणत असतात. ज्यामुळे त्यांच्या अंतर्मनावर संघ संस्कार घडत जातो. संघाच्या एक तासाच्या शाखेवर दररोज असे गीत म्हंटले जातात.

     एक तासाच्या शाखेमध्ये खेळ खेळल्यानंतर बोधकथा, अमृतवचन व सुभाषित सांगितले जाते. ज्यामधून सुसंस्कृत व देशहिताचा विचार करण्यास प्रवृत्त करणारे विचार मांडले जातात. महापुरुषांचे व साधू-संतांचे विचार अमुतवचनातुन तर साधू संतांचे विचार व श्लोक सुभाषितातून धार्मिक संस्कार करत असतात. ज्यामुळे व्यक्तीमध्ये सर्जनशीलता, परोपकार, सदाचारी वृत्ती निर्माण होते. शाखेच्या शेवटी होणारी संघाची प्रार्थना त्या स्वयंसेवकास आपण एक तासाची शाखा लावतो, म्हणजे नेमकं काय करतो? याची मीमांसा करत त्याचे स्वयंसेवक म्हणुन 'परम वैभवम् नेतुमेतत् स्वराष्ट्रम्' हे ध्येय त्याच्या मनावर कोरले जाते. हे ध्येय ज्याला कळलं तो त्याला योग्य वाटेल त्या दिशेने ध्येयपथाकडे वाटचाल करतो.
संघाचा संस्कार झालेली व्यक्ती मग राष्ट्र व समाजहितासाठी शक्य ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याविना राहत नाही.

     संघाची स्थापना १९२५ साली झाली. संघप्रारंभीच्या २५ वर्षांपर्यंत, केवळ संघटनेसाठी संघटन, संघटनेशिवाय दुसरे काहीही नाही, याचा आग्रह राहिला होता. परंतु, समाजाचे स्वरूप खूपच सरमिसळ असते. त्यात विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कलाकार, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, शिक्षातज्ज्ञ, सुरक्षा कर्मचारी, व्यापारी, इतर कर्मचारी अशा अनेक श्रेणी असतात. म्हणून, संघकार्यासाठी आवश्यक पाया तयार झाल्यावर, १९५० पासून संघाच्या योजनेनुसार स्वयंसेवक विविध क्षेत्रात जाऊन, समाजजीवनाच्या एका विशिष्ट क्षेत्रात राष्ट्रीय विचारांवर आधारित संघटन उभे करण्यासाठी जाऊ लागले. संघाचे क्रमश: विकसित (progressive unfoldment) होण्याचे हे पहिले चरण होते. श्री गुरुजींनी विविध क्षेत्रात सक्रिय झालेल्या या स्वयंसेवकांना, क्रमशः त्या क्षेत्रातील संघाचे गटनायक, राजदूत तसेच सेनापती म्हटले. आज ३५ हून अधिक संघटनांच्या माध्यमातून स्वयंसेवक शिक्षण, कृषी-शेतकरी, विद्यार्थी, श्रमिक-कामगार, इतिहास, कला, आर्थिक, क्रीडा, सहकार क्षेत्र, आरोग्य, वकील, विज्ञान, दिव्यांग, सेवा, सीमा सुरक्षा, सुरक्षा, वैचारिक इत्यादी अनेक क्षेत्रात केवळ सक्रियच नाही तर अग्रेसर आहेत. या सर्व संघटना एकाच राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असल्या तरी, स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. या संघटना संघाचा भाग किंवा शाखा नाहीत. तरीही कार्य मात्र संघाच्या संस्कारांनी प्रेरित होऊन करत असतात. भारतमातेला परम वैभवास नेण्यासाठी झटत असतात. हा व्यक्तीनिर्माणाचा अविष्कार एक तासाच्या संघाच्या शाखेमुळे शक्य होत असतो.

©कल्पेश जोशी
lekhmrut.blogspot.com

Friday 18 January 2019

देशास पत्र

प्रिय भारत देश,

     पत्र लिहण्यास कारण की, मला तुझ्यावर होणा-या आघातांची व संकटांची वित्तंबातमी दररोज मिळत असते. घडणा-या गोष्टींमुळे तुला काय यातना होत असतिल याची जाणिवही आहे मला. रोज कुठे ना कुठे होणारे आंदोलनं, मोर्चे, जाळपोळ व अधून मधून होणा-या जातीय दंगली यामुळे तू कायमच अस्वस्थ असतोस ह्याचीही कल्पना आहे. कधी कधी तर तमा न बाळगता तुझ्या नाशाच्या व तुझ्या अखंडत्वाला सुरुंग लावण्याच्या आरोळ्या, किंकाळ्या व घोषणा ऐकू येतात त्यामुळे तुझ्या सन्मानाचा कडेलोट झाल्याचा आभास होतो. यामुळे मन विषण्ण होते.

     या सर्व प्रकारामुळे तू फार दु:खी होत असशिल हे ठाऊक आहे. म्हणुनच न राहवुन तुझ्या भूतकाळातील वैभवशाली रूपाची अतिशय आठवण येत आहे. ज्याप्रमाणे तुझ्या भौगोलीक रूपात कालानुरुप बदल होत गेला, तसाच बदल तुझ्या राजकिय - सांस्कृतिक रुपातही होत गेला. परंतु तू अमर आहेस, अटळ आहेस हे सिद्ध झाले आहे. तुझ्या पोटी नरवीर जन्मास आले. ज्यांनी तुझ्यावरील सर्व संकटांना पाताळात गाडून टाकले. आम्हा आजच्या तुझ्या लेकरांस तुझा फार पुर्वीचा इतिहास नाही माहित. पण, जसजशी आम्हास स्वर्णाक्षरात लिहिलेली, तुझ्या कौतुकाने पावन झालेली विविध ग्रंथसंपदा वाचावयास मिळते, तसतसे आम्ही तुझ्या गौरवाने व किर्तीने प्रभावित होतो.

    आम्हास वाचावयास मिळते ते 'रामायण'. ज्यामध्ये क्षत्रिय राजकुमाराने आपला पुत्रधर्म यथासांग पाळत मानवजातीस छळणा-या दुष्ट रावणाचा वध करून क्षत्रियधर्मही यशस्वीपणे पाळला. एक बाणी, एक पत्नी व एकवचनी अशी किर्ती असलेल्या श्रीरामचंद्राने आपल्या मातृभूवरील रावणरुपी संकट नष्ट करुन टाकले. आम्हास वाचावयास मिळतो महाभारत ग्रंथ. ज्यामध्ये पांडव-कौरवरुपातून साक्षात धर्म व अधर्माच्या युद्धात नेहमी धर्माचाच विजय होतो असा संदेश मिळाला. देशावरील अधर्माचे वाढते काळेकुट्ट मेघ दूर सारून श्रीकृष्णरुपी स्वच्छ निर्मळ सुर्यप्रकाशातून मानवजातीस नवसंजीवनी देण्यासाठी अर्जुनरुपी मानवास मिळालेला पवित्र गीता ग्रंथही ओघाने आठवतोच. एवढेच काय तर अगदी अडीच हजारवर्षापुर्वी या पुण्यभूवर मानवा मानवामध्ये संपत्ती व धनदौलतीच्या लालसेवरून, साम्राज्यवादावरून उठलेल्या रक्तपाताच्या प्रलयंकारी हिंसाचारांपासून भगवान बुद्ध व भगवान महावीरांसारख्या पुण्यात्म्यांनी सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवला व या मातृभूवरील रक्ताच्या वाहणा-या नद्या नाहिश्या केल्या. मानवतेचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापीत झाले. सर्वदूर आनंद व सुखाचे वातावरण तयार झाले. हा गौरवशाली इतिहास जेव्हा आमच्या मन:पटलावर तरळू लागतो, तेव्हा तुझ्या अभिमानाने ऊर भरून येते.

     हे भारत देशा... पण आज तुझ्याकडे पाहून तू फार गहन चिंतेत असल्यासारखा का भासतो रे? मला माहितीये तुला कसल्या चिंतेने वेढले आहे? मला माहितीये तू असा निस्तेज का झाला आहेस? पण हे भारत देशा, तुझा तुझ्या लेकरांवर विश्वास राहिलेला नाही का रे? अरे ही श्रीराम, श्रीकृष्ण, महावीर व गौतम ही तर अगदी मोजकीच उदाहरणे आहेत बघ. पण या महात्म्यांसारखीच कित्येक महापुरुष व राष्ट्रपुरुष या भूमीवर जन्मास आले होते, त्यांची गणना कशी करावी? तू त्यांना विसरलास की काय? अरे... काळ्याभोर अवकाशातील चमकणा-या चांदण्या कधी मोजता आल्या आहेत काय? तुझ्या कुशीतसुद्धा अशीच अनंत वीररत्ने उपजली व निसर्गनियमाप्रमाणे कालवश झाली. पण त्यांच्या मुखी मरणपुर्व 'तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण' अशी अमरकाव्ये स्फुरली होती. अख्ख्या जगावर स्वत:चे राज्य प्रस्थापीत करण्याच्या उद्देशाने तुझ्या दिशेने एक वादळ घोंघावत येत होतं, तेव्हा पोरस व दस्युसारखी तुझी वीरपुत्र त्याचा कर्दनकाळ ठरली होती. तू हे भूललास तर नाही ना? तुझ्यावर झालेल्या परकिय आक्रमणात तक्षशिला व नालंदासारख्या तत्कालीन विद्यापीठातून रक्ताचं पाणी करुन लिहिलेली ग्रंथसंपदा परकिय नरपिशाच्चांनी जाळून भस्मसात करुन टाकली होती. पण म्हणुन तुझ्या पोटी जन्मलेल्या विद्वान पंडीतांची विद्वत्तता कधीच लुप्त होऊ शकली नाही. अरे...आम्हा मानवास आजकाल त्याचेदेखिल पुरावे लागतात, पण तू तर स्वत: ते अनुभवले आहेस. तेव्हा तू तरी त्या थोर विद्वानांचा अपमान होऊ देऊ नकोस. तुझ्यावर भलेही अनेक विध्वंसक धार्मिक आक्रमणं झाली असतिल, राजकिय आक्रमणं झाली असतिल. पण तुझ्या लाडक्या चंद्रगुप्ताने, राणासंगाने, महाराणा प्रतापाने, शिवाजीने व बाजीरावासारख्या महापराक्रमी वीर योद्धांनी आपल्या जीवाची बाजी लावुन त्या विषारी सर्पांपासून तुला मुक्ती दिलीच ना? मग आज का असा चेहरा पाडून बसला आहेस?

     हे भारत देशा, तुला एवढी चिंताग्रस्त व्हायची काही गरज नाही. आजच्या वाढत्या हिंसाचाराने, तुझ्याच लेकरातील आपसी भांडणांमुळे, जातीभेदामुळे व धार्मिक कटूतेमुळे तू व्यथीत झालेला असला तरी काळजी करु नकोस. ह्या समस्या सुद्धा जास्त काळ टिकणार नाहीत. खरं तर तू तुझा जगभरात वाढत चाललेला गौरव व किर्तीमूळे आनंदी व्हावयास हवे. जातीभेद व अस्पृश्यतासारख्या दुर्गूणांचा शेवट तेव्हाच व्हायला सुरुवात झाली होती, जेव्हा तुझा लाडका 'भीमराव' व 'ज्योतीबा' जन्मास आले होते. तुझी किर्ती अख्ख्या विश्वात उज्ज्वल व्हावी म्हणुन नव्वद वर्षापूर्वी एका महापुर्षाच्या डोक्यात अभिनव कल्पना सुचली होती व त्याने ती वास्तवात आणली. आज त्याच व्यक्तीच्या मस्तिष्कात फुललेल्या विचारांवर निस्वार्थी भावनेने राष्ट्रासाठी तन-मन-धनपुर्वक 'राष्ट्राय स्वाहा इदं न मम्' असे व्रत घेऊन सेवा अर्पण करण्यासाठी लाखो भारतीय स्वत:ची जात, धर्म, पंथ विसरून तुझ्याच सेवेत एकरूप होताहेत. हे तू डोळे उघडून पहावयास हवे. तुला त्या सर्वांचा सार्थ अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही. 'अब्दूल कलाम' नामक तुझा असाच एक महाविद्वान सुपूत्र होऊन गेला ना? तू तर त्याला नक्कीच विसरला नसशिल. कारण त्यानेच तर तुला तुझ्या संरक्षणासाठी मोठाले क्षेपणास्त्रे तयार करुन दिलेत. तुझं नेतृत्व करणारा तो एक कुशल व यशस्वी राष्ट्रपती होऊन गेला. तुला परम वैभवाकडे वेगाने मार्गक्रमण करता यावं म्हणुन त्यानेच तुला 'अग्नीपंख' दिलेत. त्या अग्नीपंखात प्राण भरण्यासाठी आम्ही सारे भारतीय सदैव तत्पर आहोत हे विसरु नकोस. आम्हा भारतीयांमध्ये आपापसात काही मतभेद जरूर असतिल, पण राष्ट्रासाठी व राष्ट्रसंरक्षणासाठी आम्ही सारे भेदाभेद विसरुन एकरुप होतो, याचे का कमी दाखले आहेत?

     हे भारत देशा, केवळ तुझ्या वैभवासाठी आजपर्यंत अगणित वीरांनी व वीरांगणांनी आपल्या जीवाचे रान करुन प्रसंगी प्राण देऊन तुझी प्रतिष्ठा टिकवुन ठेवली आहे, ती पुढेही तशीच सदैव तेजोमय राहिल याची खात्री बाळग. तुझ्यासाठी हौतात्म्य पत्करलेली सर्व पुण्यात्मे वर दूर अवकाशात जाऊन चांदण्यांच्या रुपात विराजमान झाली आहेत. ती सारी तुला अवकाशातुन दररोज न्याहाळत असतात. तू जर असा हताश व निराश झालास, तर त्यांच्या काळजास घरे पडतील रे. तुझी आजची वैभव संपन्नता पाहून त्यांनाही तुझ्याकडे झेप घ्यावीशी वाटते. तुझ्या कुशीत येऊन उतरावे वाटते. त्यासाठी ते अजुनही मरणांत मरण पत्करतात व तुझ्याकडे प्रेमपुर्ण भावाने झेपावतात. चांदण रात्री जी तारे तुटताना दिसतात त्याचा अजुन काय अर्थ लावावा? तुझ्या प्रेमात व भक्तीत आम्ही सदैव तल्लीन असू याची खात्री बाळग. म्हणुन हे भारत देशा...तुझ्या येणा-या सुवर्णवैभवाला आलींगन देण्यासाठी प्रसन्न चित्ताने  सज्ज हो. आम्हास त्याच सुवर्ण क्षणांची आस लागुन आहे. भारता...सर्व बळ एकवटून तुझ्या गतवैभवाच्या सिंहासनाकडे भरारी घे व जगज्जेता हो.

                                          तुझा प्रिय,
                                            कल्पेश

lekhamrut.blogspot.com