Saturday 27 October 2018

विजयादशमी

विजयादशमी उत्सव:
पु. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे नागपुर रेशीमबागेतील भाषण

दि. १८ आॅक्टोबर, गुरुवार रोजी देशभरात विजया दशमी उत्सवाच्या प्रसंगी रा. स्व. संघाचा संपुर्ण देशभरात पथसंचलन व शस्त्रपुजनाचा कार्यक्रम पार पडला. नागपुरच्या रेशीमबागेतील नागपुर महानगराच्या उत्सव प्रसंगी पु. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केवळ रेशिमबागेतील उपस्थितांसाठीच नव्हे, तर देशभरातील स्वयंसेवकांसाठी व नागरीकांसाठी उद्बोधनपर व्याख्यान दिले. तत्प्रसंगी नोबेल पुरस्कार विजेते श्री. कैलास सत्यार्थी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. तसेच के.जे. अल्फान्स, सिनियर डायरेक्टर स्टाफ सौदी अरबचे अन्वरजी अली, आळंदीचे राणोजी महाराज, विक्रमजी चुना, अरुणाचल प्रदेशातील 'भारत मेरा घर' उपक्रमातील बंधूभगिनी व पद्मश्री, संगित नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त उस्ताद रशीद खान आपली पत्नी सोहा खान यांच्यासह अतिथी म्हणुन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस घोष, व्यायामयोग व दंडाचे प्रात्यक्षिक स्वयंसेवकांनी सादर केले. त्यानंतर महानगर संघचालकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत विजयादशमी उत्सवाचे व शस्त्रपुजनाचे महत्व थोडक्यात सांगितले व आलेल्या सर्व अतिथी व नागरीकांचे सहृदय स्वागत केले. त्यानंतर प्रमुख अतिथी असलेल्या श्री कैलास सत्यार्थी यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना मार्गदर्शन करत भारताचे वैशिष्ट्य सांगतांना संवेदनशील भारत, समावेशी भारत, स्वावलंबी भारत, स्वाभीमानी भारत व सुरक्षीत भारत हे पंचामृत तत्व मांडले.

कार्यक्रमाचा समारोप पु. सरसंघचालक डाॅ. मोहनजी भागवत यांच्या उदबोधनपर भाषणाने झाला. त्यावेळेस ते बोलत होते. "भारतातील लोकांच्या काही कमतरतांमुळे देशावर अनेक विदेशी आक्रमकांनी राज्य केले. समाज आपल्या मुळ मार्गापासुन दूरावत गेला. परंतु श्री गुरुनानक यांनी पुन: आपल्या संस्कारातुन देशाला धर्माचरणाचा योग्य मार्ग दाखविला. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांशी दोन हात केले व सुभाषचंद्र बोस यांनी तर आपली स्वत:ची देशरक्षणासाठी विदेशी भूमीवर सेना तयार करत इंग्रजांना घाम फोडला होता. जालीयनवाला बागेत इंग्रज आपल्या सोबत काय व्यवहार करतिल, हे माहित असतानासुद्धा तिथे जाऊन इंग्रज सरकारच्या मुजोरपणाविरोधात आवाज उठवला व झालेल्या हत्याकांडात हौतात्म्य पत्करले. अध्यात्मिक शक्तीमुळे देशात अश्या अनेक घटना घडल्या ज्यामुळे परकियांना देश सोडण्यास भाग पडले." असे मत डाॅ. भागवत यांनी मांडले.

आजही भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या सत्ता बदलतात किंवा कायम राहतात. परंतु, त्यांच्याकडून भारताला असलेला धोका कायम असतो. सत्ता बदलल्या म्हणुन देशाचे वर्तन बदलत नसते. नाहीतर जम्मू कश्मीरसह सीमावर्ती भागात होणारे शस्त्रसंधी उल्लंघन व गोळीबार थांबला असता. म्हणुनच आपणांस देशरक्षणार्थ सदैव तत्पर राहण्याची गरज आहे. शत्रुवर आपला दबदबा कायम राखण्यासाठी आपल्याला सदैव बलसंपन्न रहावं लागेल. जेणेकरून शत्रुची भारताकडे पाहण्याची हिंमत होणार नाही." असे मत मांडत डाॅ. भागवतांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

देशरक्षणासाठी भारताचे वीर जवान सीमेवर आपल्या कुटूंबापासून दूर रात्रंदिवस पहारा देत असतात. ते जवान त्यांचे कर्तव्य पार पाडताना कमी पडत नाही. पण एक नागरीक म्हणुन आपण आपले कर्तव्य का विसरतो? जवानांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी आपण घ्यावयास हवी व त्यांना शक्य ती मदत आपण केली पाहिजे. स्वत:च्या वैयक्तीक व कौटुंबीक कर्तव्यांशिवाय एक भारतीय म्हणुन असलेल्या कर्तव्यांचा समाजाला विसर कधीपासुन विसर पडू लागला? भारतीय समाजाने देश सरकारला कधीपासुन सोपवला? जे काही करायचे ते सरकारनेच, असा पायंडा पडत चालला आहे जो देशाच्या भवितव्यासाठी घातक आहे. ज्या परिवाराने आपल्या घरातील व्यक्ती देशासाठी सीमेवर पाठवली त्या परिवाराच्या प्रत्येक सुख दु:खात समाजाने मनापासुन सहभाग घेतला पाहिजे. समाजकर्तव्याची जाणिव करुन देणारा असा संदेशही डाॅ. भागवतांनी त्यावेळी दिला.

भारताला प्रचंड मोठी सागरी सीमा लाभली आहे. पश्चिम समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रात शेकडो लहानमोठे द्वीप आहेत. ज्यांच्यावर आपले कायम लक्ष असले पाहिजे व त्यांचा उपयोग देशाच्या संरक्षणासाठी केला पाहिजे. भारताची वाढती शक्ती पाहता काही देश भारताविरोधात शेजारील लहानमोठ्या देशात आपले प्रस्थ जमवत आहेत. त्या अनुषंगाने भारताने सदैव कटीबद्ध राहुन सागरी सीमा अधिक सुरक्षित करणे गरजेचे असल्याचे सांगत चीनपासुन देशाला असलेला धोका विषद केला.
भारताने आता नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करून स्वावलंबी व्हावयास हवे. शस्त्रांसाठी दुस-या देशांवर निर्भर राहण्यापेक्षा आपण स्वयंपुर्ण कसे होऊ याचा विचार झाला पाहिजे. स्वावलंबनताच देशाला आता जास्त सुरक्षित करु शकेल असे मत त्यांनी मांडले 

देशाला बाह्यशक्तींपासुन जसा धोका आहे तसाच अंतर्गत शक्तींपासुनही आहे. आंतरिक सुरक्षेस धोका निर्माण करणा-यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. तसेच त्यांना समर्थन करणा-यांचे कारणे शोधुन त्यावरही उपाय केला गेला पाहिजे. देशातील वंचित, शोषित व पीडितांना काही वाईट शक्तींकडून भडकवले जात आहे. या पीडितांचा वापर केवळ स्वत:चा स्वार्थ पुर्ण करण्यासाठी केला जात आहे. पीडित लोकांचे अश्या कामात देशविरोधी शक्तींना मदत करण्याचं कारण समजुन घ्यायला पाहिजे. देशातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहचतो का? यावर विचार झाला पाहिजे. देशविरोधी घोषणा देणा-या व बंदूकीच्या जोरावर क्रांती आणू पाहणा-यांना गरीब, दिन दलितांची व वनवासी बांधवांची काळजी कधीपासुन वाटू लागली? देशात आंतरीक सुरक्षेला आव्हान देणा-या घटना वाढत आहेत व त्यांचे करते करविते भारताबाहेर इटली, पाकिस्तान व अमेरिकेसारख्या देशात असणे अनेक शंका निर्माण करतात. ते देशवासीयांनी वेळीच ओळखले पाहिजे, असे ते म्हणाले.

आज सगळीकडे शहरी नक्षलवादावर चर्चा सुरु असतात. पण शहरी नक्षलवाद काल परवा जन्माला आला नसुन त्याची सुरुवात मागील ब-याच वर्षापासुन सुरु होती. सरकार कोणतेही असो पण त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या व नागरीकांच्या सुचनांचा विचार वेळीच केला तर भविष्यातील नक्षलवादासारख्या असुरी शक्ती डोके वर काढू शकणार नाही. छोट्या छोट्या संघटनांमार्फत, आंदोलनांमार्फत विद्यार्थ्यांना भडकावण्याचे माओवादी काम निरंतर चालू असते. विदेशात भारताची सतत निंदा करणारे देशातही 'भारत तेरे टुकडे होंगे' अश्या घोषणा देतात. हे एक प्रकारे मानसशास्त्रीय युद्ध चालू आहे. ज्याचं विद्रुप रूप दहा वीस वर्षानंतर दिसू लागते. म्हणुन भारतीयांनी सदैव सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे डाॅ. मोहनजी भागवत सांगत होते.

गरीब आदीवासी समाजाच्या मुलभूत गरजा पुर्ण झाल्यास ते देशविरोधी शक्तींना बळी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच देशाची आंतरीक सुरक्षा करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस यंत्रणेला अत्याधुनिक करुन त्यांच्या योगक्षेमाचा विचार झाला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री कैलास सत्यार्थींनी स्वयंसेवकांना बाल व बालिकांवर होणा-या अत्याचाराविरोधात काम करण्याच्या केलेल्या आवाहनास आपल्या वाणीतून समाधानकारक उत्तर देताना मोहनजींनी स्वयंसेवक आपापल्या कार्यक्षेत्रात सदैव मदत करतील असा विश्वास व्यक्त केला.

बाल अत्याचार वाढत चाललेल्या परिस्थितीवर बोलताना डाॅ. मोहनजी भागवत म्हणाले, "बालकांवर आपल्या घरातुनच चांगले संस्कार मिळणे गरजेचे आहे. आजकाल बालकांना चांगले संदेश मिळणा-या बोधकथा सांगणे फार कमी झाले आहे. नवीन पीढीस सुसंस्कार, सदविचार देणे महत्वाचे आहे. हातातील मोबाईल फोन केवळ यंत्र आहे, त्याचा सदुपयोग कसा करावा हे केवळ त्या वापरकर्त्याच्या संस्कारावर अवलंबुन आहे. त्यामुळे बाललैंगिक अत्याचार कमी करायचे असतिल तर केवळ कायदे करुन चालणार नाही, तर समाजमन बदलणे जास्त आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले."

देशाची अखंडता व सार्वभौमता टिकुन राहण्यासाठी 'बंधूता' फार महत्वाची आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान समर्पित करताना बंधूतेच्या तत्वाचे महत्व पटवुन दिले आहे. देशातील बंधूतेला तडा गेला म्हणजे देशविरोधी शक्तींचे फावते. तसे न होऊ देण्यासाठी डाॅ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या बंधुत्वाचा विसर पडता कामा नये. असे झाल्यास कितीही मोठी देशविरोधी शक्ती देशाचं काही बिघडवू शकणार नाही असा विश्वास डाॅ. भागवतांनी व्यक्त केला.

काळानुरुप होणारे परिवर्तन समाजाने स्विकार केलेले पाहिजे. नाहीतर समाजात अशांती व अस्थिरता निर्माण होते, हे केरळच्या शबरीमाला मंदिराच्या प्रकरणाचे उदाहरण देऊन डाॅ. भागवतांनी पटवुन दिले. न्यायालयाने दिलेला निर्णय स्त्री-पुरुष समानता जोपासणारा आहे. पण लाखो लोकांची श्रद्धा काय आहे, याचा विचार न करता हा निर्णय दिला. म्हणुन वाद निर्माण झाला. न्यायाच्या संबंधित बाबी जश्या न्यायालयाद्वारा न्यायसंमत होतात, त्याचप्रमाणे धर्माच्या बाबतीत असलेल्या बाबी धर्मगुरु किंवा आचार्यांकडून धर्मसंमत होतात. न्यायालयाद्वारे शबरीमालाचा निर्णय समाजावर थोपवला गेला म्हणुनच केरळमध्ये अशांती निर्माण झाली आहे. प्रबोधन करुन जोपर्यंत समाजमन बदलत नाही तोपर्यंत असे धाडसी निर्णय अस्थिरता व अशांतीला निमंत्रण देणारे ठरतात. असे मत डाॅ. मोहनजी भागवतांनी मांडले.

देशातील सर्वात संवेदनशील मुद्द्यापैकी एक असलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराबाबत बोलताना सरसंघचालक म्हणाले, "बाबर एक आक्रमक होता. त्याला भारतातील हिंदू व मुसलमानांविषयी प्रेम व स्नेह नव्हते. भारताला लुटण्यासाठीच तो जर चालुन आला होता, तर त्याच्या आठवणीचं प्रतिक असलेल्या बाबरी मशिदला का जपावे? आता तर सिद्ध झाले आहे की तिथे पुर्वी मंदिरच होते व मंदिर पाडून मशिद उभारली गेली होती. परंतु काही लोकांना मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आहे, त्यामुळे ते काही ना काही कारण पुढे करत वेळ मारुन नेतात. देशातील हिंदु समाज कित्येक वर्षापासुन भव्य राममंदिर तयार होण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे रामजन्मभूमी आंदोलनाचे सहयोगी संघटन म्हणुन आमची इच्छा आहे की सरकारने कायदा बनवुन अयोध्येत भव्य राममंदिर त्वरीत उभारावं."

मतदान व नोटाविषयी बोलताना डाॅ. भागवत म्हणाले की मतदानाचा अधिकार म्हणजे जनतेला मिळालेलं सर्वात मोठं शस्त्र आहे. जनता मतदान करुन सत्ता टिकवु शकते व बदलवु शकते. मतदान करताना सगळेच चांगल्या व्यक्तीला कौल देतात. पण शंभर टक्के चांगला किंवा शंभर टक्के वाईट कुणीही नसतो. त्यामुळे 'सगळ्यात चांगला' असलेल्या उमेदवारास पसंती देणे जास्त हिताचे ठरते. नोटा पर्यायाचा उपयोग करतानाही 'सर्वात चांगला' किंवा 'अव्हेइलेबल बेस्ट'चा विचार करुन कौल दिला पाहिजे. नाहीतर 'सर्वात वाईट' उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते. मतदाराने याचा विचार करावा असेही ते म्हणाले.

देशाला परम वैभव संपन्न करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ज्यात सर्व सज्जन शक्ती एकवटली पाहिजे. आपलं लक्ष्य दूर नाही. केवळ विचार करत बसण्यापेक्षा काम करण्यास सुरुवात करावयास हवी. ध्येयाकडे वाटचाल सुरु करावयास हवी. स्वत: जागृत होऊन देशालाही जागृत आपणांस करायचे आहे, असे सांगुन डाॅ. भागवतांनी आपल्या वाणीस विराम दिला.

-कल्पेश गजानन जोशी
Lekhamrut.blogspot.com

कैलाशजींचे सत्यार्थी वचन

           कैलाशजींचे सत्यार्थी वचन

     विजया दशमी निमित्त नागपुर, रेशीमबागेतील रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना अनेक महत्वाच्या मुद्यांना हात घालत सत्यार्थींच्या भाषणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आपल्या जीवनातील काही अनुभव मांडतांना त्यांनी कश्याप्रकारे बालकांवरील अत्याचाराविरोधात मोहिम चालवली त्याचे वर्णन ते करत होते. जगभरात सर्वत्र बालकांवर अत्याचार होत होते, परंतु कुठेच त्याविरोधात आवाज उठवला जात नव्हता. आपल्या भारतात त्याविरोधात माझ्यारुपाने सुरुवात झाली. माझा श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेवर पुर्ण विश्वास आहे व त्यामुळेच मला प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले. हे महान कार्य साक्षात परमेश्वरानेच माझ्याकडून करुन घेतले व भारताच्या पुण्यपावन भूमीमुळेच याची सुरुवात भारतात झाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बालरोजगाराबाबत बोलताना सत्यार्थी म्हणाले, गेल्या वीस वर्षात बालमजुरीचे प्रमाण २६ कोटीवरुन १५ कोटीपर्यंत कमी झाले. यात भारतानेही खूप प्रगती केली आहे. परंतु आजही देशात बाल अत्याचाराचे प्रमाण चिंताजनक आहे. आम्ही सोडवुन आणलेले अनेक बालके आपल्या घरी व माता पित्यांकडे जाताना उदास असतात. कारण त्यांच्या हातुन आजपर्यंत जे वाईट कामे झाली त्यामुळे आपण अपवित्र झाले असल्याची भावना त्यांच्या मनात असते. यासाठी समाजानेही अश्या बालकांकडे सकारात्मतेने व स्नेहपुर्ण भावनेने पहावे अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली.

     उत्सव सुरु होताना 'स्वयं अब जागकर हमको, जगाना देश है अपना' या सांघिक गीतामुळे सत्यार्थी फार प्रभावित झाले. त्याविषयी बोलताना सत्यार्थी म्हणाले, की भारतात शेकडो समस्या आहेत परंतु, भारतात समस्यांवरील अरबो उपायही आहेत. भारतात असे अरबो लोक आहेत जे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील असंख्य समस्यांचे उपाय जाणतात, ही अभिमानास्पद बाब आहे.

     आमच्या लहाणपणी घरी 'सत्यनारायण' व 'श्रीरामचरितमानस' कथेचा कार्यक्रम असे. तेव्हा आमची आई गायीच्या दूध व गोमुत्रापासुन बनविलेले पंचामृत आम्हाला देत असे. गायीला खाऊ घातल्याशिवाय घरात कुणीही जेवायला सुरुवात बसत नसे. असे सांगत आपल्या घरातील पवित्र वातावरणाचा उल्लेख करताना सत्यार्थींचे स्वर आनंदाने भारावले गेले होते.

     सत्यार्थींच्या संपुर्ण भाषणातील सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी मांडलेले भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संवेदनशील भारत, समावेशी भारत, सुरक्षीत भारत, स्वावलंबी भारत व स्वाभीमानी भारत ही पाच 'पंचामृत तत्वे'.

     संवेदनशीलता ही भारताची ताकद असल्याचे सांगताना जगात वेगाने होणारी विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती पाहता माणुस एकांगी व उपभोक्तावादाकडे वळत जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. परंतु अश्या परिस्थितीतही जगाला समाधान व सौख्याचा मार्ग केवळ पुण्यपवित्र भारतच दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     समावेशी तत्व समजावुन सांगतांना त्यांनी सांगितले की समावेशकता भारताचे सौंदर्य आहे व त्याचे 'सहिष्णुता' व 'परस्पर सन्मान' हे आधारस्तंभ आहे. भारतात अनेक जाती पंथ आहेत, अनेक विचारप्रणाली आहे, अनेक भाषा आहे व ही भारताची एक ताकद आहे. ऋग्वेदाच्या ओवींचे प्रमाण देत भारतातील ग्रंथ व ऋषीमुनी आपणांस सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संदेश देतात. हा समावेशकतेचा संदेश असतो. ज्यामुळे भारताची स्वत:ची अशी ओळख निर्माण झाली आहे.

     भारताचे वीर जवान देशाची सुरक्षा करतात ज्यामुळे आपण स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो. परंतु, देशातील अंतर्गत सुरक्षाही तितकीच महत्वाची अाहे. देशात बाल व बालिका सुरक्षीत नसल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला. भारत माँ दुर्गेचा व लक्ष्मीचा शक्तीशाली देश आहे. परंतु आजकाल देशातील अल्पवयीन मुलांच्या हातातील मोबाईल त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. धर्माच्या नावाखाली चालणा-या संस्था बालकांचा व बालिकांचा व्यापार करतात  व ही बाब गंभीर आहे, असेही ते म्हणाले. यावरून चर्चमधील व ख्रिश्चन धर्मादाय संस्थांमधील नुकतेच उघडकीस आलेले प्रकरणे किती गंभीर आहेत, याची कल्पना येऊ शकेल. देशात पाॅर्नोग्राफीने तरुणांच्या चारित्र्याला बिघडवण्याचा धुमाकूळ घातला असुन त्याविरोधात सामाजिक कार्यातुन व कायद्याच्या माध्यमातुन कसा अंकुश लावता येईल, याचे प्रयत्न आम्ही करत आहोत असे त्यांनी सांगितले.

     मागील वर्षी जम्मूकश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत 'सुरक्षित बचपन, सुरक्षीत भारत'  अशी जनजागृती करणारी यात्रा काढली होती. या यात्रेला गावोगावी संघाच्या स्वयंसेवकांनी जो प्रतिसाद दिला व सरसंघचालक मोहनजी भागवतांनी जो संदेश पाठवला त्याबद्दल सत्यार्थींनी आभार व्यक्त केले.

     स्वावलंबी भारतविषयी बोलताना सत्यार्थी म्हणाले की केवळ विदेशी मदतीच्या जोरावर व मोजक्याच मोठ्या उद्योगपतींच्या अधिक श्रीमंत होण्यामुळे भारत आत्मनिर्भर होणार नाही. भारत कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याला शेतकरी, लहान व्यापारी व मजुरवर्गाला सक्षम करावे लागेल. भारताच्या सनातन संस्कृतीचे शाश्वतता, सार्वभौमिकता व समग्रता हे तीन पैलू आहेत. त्यामुळे देशाला सनातन संस्कृती लाभली व हेच भारताचे वैशिष्ट्य आहे व त्यामुळेच आपल्यात स्वाभीमान जागृत होत असल्याचे त्यानी नमूद केले.

     आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी देशातील तरुणांसाठी आपणांस कुणाचे याचक किंवा आलोचक होऊन चालणार नाही तर आपली संस्कृती टिकवुन तिच्यानुसार मार्गक्रमण करावे लागेल असा संदेश दिला. तसेच रा.स्व. संघातील युवकांना त्यांनी आपल्या देशभरातील शाखांच्या माध्यमातून आपल्या गावातील बालक व बालिकांवर अत्याचार न व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जावे असा आग्रह केला. देशभरातील गावागावात संघाचे स्वयंसेवक आहेत, शाखा आहेत. त्यांनी जर ह्या कामास हातभार लावला तर आपल्या देशातील बाल अत्याचार संपुष्टात येऊन एक अख्खी पीढी सुरक्षित झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाला रामायणातील जांबुवंताची भूमिका पार पाडायची आहे व देशातील प्रत्येक हनुमंतास म्हणजेच युवकास जागृत करायचे आहे असा प्रेमळ संदेशही त्यांनी यावेळी दिला व आपल्या प्रेरणादायी भाषणाचा समारोप केला.

-कल्पेश गजानन जोशी
Kavesh37@yahoo.com

Wednesday 24 October 2018

आणि_त्याने_डोळे_उघडले

#आणि_त्याने_डोळे_उघडले

सोयगांवात नुकतीच घडलेली सत्य घटना.

दिवसभर शेतीचे काम करुन सोनवणे कुटूंबीय झोपी गेले होते. घरात आई आपल्या लेकराला जवळ घेऊन झोपली होती. सर्वत्र शांतता पसरली होती व शांततेवर रात्रीने ताबा मिळवलेला होता. पंख्याची तेवढी घरघर चालू होती. तेवढ्यात शांततेला भंग करत सहा वर्षाच्या साईचा रडण्याचा आवाज आला. त्याचा रडणं ऐकुन आईला लगेच जाग आली. साई डोळे चोळत उठुन बसला होता व मोठ्यानेच रडू लागला. 'दादा, मला चावलं' असं कानाला हात लावत काहीसं बडबडत होता. मंद लाईटच्या प्रकाशातच आईने त्याच्या कानाला हात लावुन पाहिला. हाताला काहीतरी ओलसर स्पर्शाचा आभास त्या माऊलीला झाला. त्या मंद उजेडातच तिने आपली बोटांकडे नजर फिरवली. आपल्या बोटांना रक्त?? रक्तासारखे काही तरी आपल्या बोटावर दिसत असल्याची तिला जाणवले. साईच्या रडण्यामुळे घरातली सगळीच मंडळी जागी झाली. साईच्या दादांनी म्हणजेच वडिलांनी लाईटाचं बटन दाबलं. आणि पाहता तो काय? त्या माऊलीच्या बोटावर खरंच पुसटसे रक्त दिसत होते. आणि ते पाहुन सा-यांच्या हृदयाचे ठोके वाढले. भीतीने चेहरे ग्रासले. दादांनीही साईच्या कानाजवळ पाहिले. साईच्या कानावर रक्ताचे बारीक दोन थेंबं त्यांच्या दृष्टीस पडली. कश्याचे असावे? काळजीयुक्त चेह-यांवर प्रश्नचिन्ह पडले. आणि डोक्यात विचार आला. सर्पदंश..? डोक्यात प्रश्न तरळला आणि भीतीपोटी सगळ्यांनी अख्खे घर पिंजुन काढले. पण काहीच दिसले नाही. शेवटी काहीतरी किंडं किटकुल चावलं असावं असा विचार करुन पुन्हा सारे निश्चिंत होऊन झोपु लागले. साई अजुनही रडत होता. आई त्याला कुरवाळत झोपवत होती. त्याचं रडणं कमी झालं. घर पुन्हा शांत झाले. साईच्या आईचा डोळा लागत होता. तेवढ्यात तिच्या हाताला काहीतरी थंड स्पर्श झाला. तिने डोळे खडकन उघडले व उठुन बसत साईच्या वडिलांना मोठ्याने आवाज दिला. त्यांनी दरवाज्यातुन सरपटत जाणारा सर्प पाहिला. आणि लाईट लावेपर्यंत क्षणार्धात तो नाहिसा झाला.

आता मात्र घरातील सगळेच घाबरले. साईच्या वडिलांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. साईची प्रकृती अजुनही ठिक होती, तो रडत होता पण त्याचा चेहरा सामान्य नव्हता. साईला सर्पदंश झाल्याचे त्यांना आता मान्य करावे लागले.  आईला तर रडू कोसळले. आजीही रडू लागली. पित्यालाही धक्का बसला होता. पण रडून चालणार नव्हते. त्यांनी गल्लीतील शेजा-यांना तात्काळ उठवले. शेजारपाजारची मंडळी जमली. आणि साईला रात्री दोन वाजता सोयगांवच्या ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराकडे सारेजण घेऊन निघाले. भैरवनाथाच्या धावा करत झपाझप पावलं टाकत सारेजण त्या काळोख्या रात्री मंदिरात पोहचले. भैरवनाथाचे दर्शन झाले. तेथिल रक्षा साईच्या कपाळी लावली व सगळे पुन्हा घाई घाईतच घरी परतले.

साईची प्रकृती खालावत चालली होती. वैद्यकिय उपचारासाठी गावातीलच सरकारी दवाखान्यात त्याला नेण्यात आले. त्याची नाजुक स्थिती पाहता स्थानिक डाॅक्टरांनी प्रथमोपचार केले व लगेच जळगांवला एखाद्या चांगल्या क्रिटिकल केअर सेंटरला जाण्याचा सल्ला दिला. अवघ्या दहा मिनिटात रुग्णवाहिका डाॅक्टरांसमवेत तेथे हजर झाली. आणि जळगांवचा प्रवास सुरु झाला.

दादा आपल्या साईला मांडीवर घेऊन बसले होते. आई सारखी देवाकडे प्रार्थना करत होती. एकेक सेकंद तासासमान भासत होता. गाडी पहुरपर्यंत पोहचली. साई मान सोडू लागला होता. विष वेगाने त्याच्या शरीरात पसरत होते. शिवाय कानाला सर्पदंश झाल्यामुळे मेंदूपर्यंत कमी वेळेत वीष पोहचण्याचा धोका होता. अश्या परिस्थितीत काळजीने व्याकुळ वडिल एकसारखे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. स्वत:चे मन समाधान करत होते. साई त्यांना होकार देत होता. गाडी नेरीजवळ पोहचली. तशी साईने मान सोडली. त्याला डोळेही उघडवेना झाले. वीषाने त्याच्या शरीरावर बराच कब्जा केला होता. पण वडिलांना अजुनही तो होकार देत होता. बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण पापण्या मात्र त्याने मिटल्या होत्या. एव्हाना रुग्णवाहिका जळगांवच्या सिव्हील हाॅस्पीटलजवळ येऊन थांबली होती. दवाखान्यात प्रवेश केला. डाॅक्टर भेटले. पण साईची नाजुक स्थिती पाहता त्यांनी त्याची शाश्वती घेता येणार नसल्याचे सांगितले. आम्ही सर्वतो प्रयत्न करु. पण तुम्हाला जर अन्य चांगल्या हाॅस्पीटलमध्ये न्यायचे असेल तर तुम्ही नेऊ शकता असा सल्लाही त्यांनी दिला. आता साईचे केवळ हृदयाचे ठोके चालू होते. वडिलांच्या आवाजाला त्याचा प्रतिसादही बंद झाला होता. सोबत आलेल्या गावकरी मित्रांनी तात्काळ मोबाईलवर काही नंबर फिरवले. जळगांवातील चांगल्यात चांगल्या क्रिटिकल केअर सेंटर्सना फोन लावले. अॅपेक्स हाॅस्पीटलच्या आयसीयु मध्ये जागा रिक्त होती. आणि क्षणाचाही विलंब न लावता साईला अॅपेक्समध्ये दाखल केले. इथेही डाॅक्टरांनी साईची गंभीर प्रकृती पाहुन त्यांना स्पष्ट केले की 'त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करु. तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा. आता सारे त्याच्याच हाती आहे.' साईचा मृत्युशी संघर्ष चालूच होता.

गावात ही बातमी भल्या पहाटेच पसरली होती. सगळ्यांनाच काळजी वाटत होती. तिकडे डाॅक्टरांचे प्रयत्न सुरु होते व इकडे गावात सगळ्यांनी देवाजवळ प्रार्थना सुरु केली. कुणी जप जाप्य करत होतं, तर कुणी देव पाण्यात टाकले. कुणी गजानन बावन्नी घेत होतं, तर कुणी आपल्या कुलदैवतेपुढे साईसाठी पदर पसरत होतं. साईचा प्रतिसाद पाहता डाॅक्टरांनी वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले, अन् आतापर्यंत खंबीरपणे आपल्या लेकरासाठी तळमळत असलेल्या बापाच्या अश्रुचा बांध फुटला. मित्रांच्याही डोळ्यात पाणी आले. मित्र त्यांना धीर देत होते.

साई पुर्णपणे बेशुद्धावस्थेत होता. अॅडमीट करुन बारा तास झाले तरी त्याला शुद्ध येईना. डाॅक्टरांशी सारखी विचारपुस होत होती. 'शेवटी डाॅक्टरांनी पुढील चोवीस तास तुम्ही आम्हाला काहीच विचारु नका. आम्ही जे करता येईल ते करत आहोत. तुम्ही फक्त आता देवाजवळ प्रार्थना करा. मुलगा जगला वाचला तर ती देवाची कृपा' असे उदगार काढले. मनात शंका कुशंकांचे आधीच काहुर उठले होते. नको नको ते वाईट विचार येत होते. त्यात अजुन चिंता वाढली. काय होणार नि काय नाही काही कळत नव्हते.

साईला बेशुद्धावस्थेत जाऊन आता तीस तास होत आले होते. पण त्याला शुद्ध आली नव्हती की प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झाली नव्हती. पण डाॅक्टरांच्या ट्रीटमेंटला आता कुठेतरी यश येऊ लागले होते. कारण औषधांचा परिणाम रिपोर्टवर साफ दिसुन येत होता. त्यामुळे कुठेतरी आशेचा किरण दिसु लागला होता. डाॅक्टर त्याची केवळ शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. एकदा का तो शुद्धीवर आला की त्याचा अर्धा धोका टळला म्हणुन समजा. अश्यातच साईपर्यंत आवाजाच्या संवेदना पोहचतात का हे पाहण्यासाठी डाॅक्टरांनी त्याच्याशी गोड गोड बोलायला सुरुवात केली. नर्सेसही त्याच्याशी लाडीक स्वरात बोलत होत्या. 'आपल्याला फिरायला जायचंय, खाऊ खायचाय, आईसक्रिमही घ्यायचं मस्त मस्त' असं बोलत त्याच्या संवेदना व प्रतिसाद जाणुन घेण्यासाठी प्रयत्न मनापासुन करत होत्या. अश्यातच बोलता बोलता नर्सने त्याच्या वडिलांचे नाव उच्चारले न उच्चारले तोच त्याच्या बोटांची सुक्ष्म हालचाल झाली. बंद डोळ्याआड असलेल्या बुबुळांनी क्षणिक हालचाल केली. हे पाहुन नर्सला आनंदाश्चर्य वाटले. साई त्याच्या वडिलांना प्रतिसाद देतोय हे त्यांच्या लक्षात आले. नर्सने ताबडतोब त्याच्या वडिलांना बोलावुन घेतले.

जीवन मृत्युच्या लढाईतील आता अंतिम चरण सुरु होते. साईचे वडिल त्याच्या बेडजवळ सचिंत स्थितीत उभे होते. नर्सने त्यांना साईशी गोड गोड पण मोठ्याने बोलायला सांगितले. आयसीयु युनिटमधील सगळ्या पेशंटचेही लक्ष आता इकडेच लागुन होते. सगळे जणु जीव मुठीत घेऊन बसले होते. पुर्ण अवसान एकवटून त्या पित्याने आपल्या काळजाच्या तुकड्यास हाक दिली.

"साई...बेटा ऊठ. आपल्याला घरी जायचंय ना?"

त्या बापाच्या कंठातून निघालेले स्वर अदृश्यपणे हवेत तरंगत त्या लेकराच्या कर्णातून वाहत जात थेट त्याच्या मस्तिष्कावर आदळले. आणि मंदिरांमध्ये होणा-या प्रार्थना जणु फळास आल्या. डाॅक्टरांच्या प्रयत्नांना यश आले.

'साईने खाडकन डोळे उघडले!'

सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पित्याचा आवाज ऐकुन साईने आपले केवळ नेत्रच उघडले नव्हते, तर पुन्हा ही सृष्टी तो बघत होता. त्याचा जणु पुनर्जन्मच झाला होता. साश्रू नयनांनी तो बालक आपल्या पित्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातुन घळघळा अश्रु गळत होते. पित्याच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहत होते. सर्वत्र आनंद पसरला होता. काळजीयुक्त काळवंडलेले चेहरे हर्षोल्हासाने व समाधानाने अक्षरश: उजळून निघाले.

पण डाॅक्टरांसमोर अजुनही एक यक्ष प्रश्न होताच. साईला शुद्ध आली होती. पण स्मृती??
विषाचा परिणाम जर मेंदुवर झाला असेल तर त्याची स्मृती जाण्याचा धोका होता. म्हणुन डाॅक्टरांनी परीक्षणासाठी त्यास विचारले, " साई, बाळा हे तुझे पप्पा आहेत ना?" त्यासरशी त्याने किंचित होकारार्थी मान हलवली. आणि हाही धोका टळल्याचे समाधान झाले. त्या माता पित्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
डाॅ. माजीद खान यांनी तर ही 'ईश्वरी कृपा' असल्याची प्रतिक्रिया दिली. तिकडे गावातही सर्व आप्तेष्टांना आनंद झाला.

पुढील दोन दिवसात साईची प्रकृती पुर्ववत झाली.
त्या पित्याने हर्षयुक्त नयनांनी डाॅक्टरांचे हात जोडून आभार मानले. आणि प्रेमळ मायेने पेशंटची सेवाभावे काळजी करणा-या व आपल्या गोडवाणीतून पेशंटचा अर्धा आजार पळवुन लावणा-या तेथिल नर्सेसचेही अनंत आभार मानले. विज्ञानाला अध्यात्माची व अध्यात्माला विज्ञानाची जोड असली म्हणजे अशक्यप्राय वाटणारी गोष्टही शक्य करता येते, हे या घटनेने पुन्हा सिद्ध झाले.

©कल्पेश गजानन जोशी
lekhamrut.blogspot.com

Wednesday 17 October 2018

विजयादशमी : विजयोत्सव

विजयादशमी : विजयोत्सव

      आपल्या हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येत असतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला 'विजया दशमी' असेही म्हणतात. दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव  अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शास्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस होता. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला होता. तसेच, पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते.

      फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे ‘कौत्स’ नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, “मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? तुम्ही मागाल ते मी देईन.” ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.

      कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे त्याचा खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. यावर युक्ती काढून इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.

      रघुराजाने ती सर्व नाणी कौत्सास दिली. त्याने त्या वरतंतू ऋषिपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. परंतु त्यांनी फक्त १४ कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्सास परत दिल्या. त्या त्याने रघुराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढिग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.

      असा हा दसरा सण ज्याला आपण विजया दशमीही म्हणतो. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा म्हणजेच विजयादशमी. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस. विजयाचं प्रतिक म्हणुन त्याकडे पाहिले जाते. म्हणुनच दसरा सणाला सिमोल्लंघनाचेही महत्व आहे. पुर्वी भारतातील असलेल्या सप्त बंद्यांपैकी एक बंदी सिंधूबंदी किंवा सागरबंदी होती. सिंधू नदी ओलांडून जाणे किंवा आपल्या देशाची सिमा ओलांडून जाण्यावर बंदी असे. त्यामुळे अनेक लढायांमध्ये भारतीय शुरवीरांनी केवळ सिंधूपर्यंतच शत्रुला पिटाळून लावले आहे. सिंधूपल्याड जाण्यास प्रतिबंध होता. परंतु या बंद्या राष्ट्रहितासाठी हानीकारक आहेत व त्या उखाडून फेकल्याशिवाय देश सुरक्षित राहणे कठीण होते.  म्हणुनच या बंद्यांमधून मुक्तीसाठी श्री रामचंद्रांनी सागर ओलांडून रावणाचा वध केला होता, याचा विचार करावा लागतो.

      कालांतराने हा सिंधूबंदीचा विचार नामशेष होत गेला. स्वातंत्र्य संग्रामातील स्वा. सावरकर, डाॅ. अॅनी बेझंट, श्यामजी कृष्ण वर्मा, गदर चळवळीचे नेते खानखोजे, काशीराम व लाला हरदयाळ सारखे अनेक नेते विदेशातुन ब्रिटिशांविरुद्ध सुत्र हलवित होते. याच पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते, की नेतांजींनीही ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन भारताबाहेर पलायन केले होते. शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेल्या सुटकेचा प्रसंग त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला होता. त्याच नेताजींनी आपल्या आझाद हिंद सेनेसह चालुन येऊन ब्रिटिशांना घाम फोडला होता.

      अगदी अलिकडील काही घटनांचा विचार केल्यास लक्षात येते की मागील दोन तीन वर्षात भारताच्या वीर जवानांनी म्यानमारच्या हद्दीत घुसुन आतंकवाद्यांचा खात्मा केला होता. ‌तसेच पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन उरी हल्ल्याचा प्रतिशोध घेत ४९ आतंकवाद्यांना यमसदनी धाडले होते. भारतीयांसाठी या घटना सदैव प्रेरणादायी ठरतात व त्यांचा उत्सव विजया दशमीच्या स्वरुपात साजरी केला जातो. म्हणुनच त्या दिवशी केल्या जाणा-या शस्त्रपुजनाचे अनन्य साधारण महत्व असते. म्हणुनच विजयादशमी उत्सव ख-या अर्थाने विजयोत्सव म्हणुवच साजरी होत असतो.

-कल्पेश गजानन जोशी
Lekhamrut.blogspot.com

Saturday 13 October 2018

सोयगांवातील संघ स्मृती...

सोयगांवातील संघ स्मृती...

संघ सरिता या स्मृती ग्रंथातील सोयगावातील संघ इतिहास वाचुन अाज अक्षरश: भारावल्यागत झाले. १९७० च्या आसपास झालेले संघाचे बीजारोपण आज सोयगांवातील संघाचे वटवृक्ष होताना दिसत आहे. आजपासुन जवळजवळ पन्नास वर्षापुर्वीपासुन कित्येकांनी त्याग व समर्पणनाची परिकाष्ठा केली, तेव्हा कुठे आज आमच्या पीढीला संघ खुल्या मनाने व निडरतेने समजुन घेता येतो व संघसेवाही करता येते.

सोयगांवात संघाचं हे बीजारोपण होताना दादा लाड व सुधाकरराव नेवपुरकर या प्रचारकांसोबत हळद्याचे दत्तोपंत हळदेकर, अप्पा कापरे, राजा भैय्या, शांतारामअण्णा देसाई, सारंग मापारी, मधुकर मापारी, हरीभाऊ चौधरी, राम पठाडे व उत्तम थोरात असे काही स्वयंसेवक उभे ठाकले होते. त्यांच्या त्याग, समर्पण व मेहनतीमुळे सोयगांव तालुक्यात संघ वाढण्यास मदत झाली.

सर्वदूर संघविरोधी व काँग्रेसी वातावरणात संघाची शाखा लावणे सोपे काम नव्हते. सोयगांवात तर काँग्रेसचेच राज्य होते. त्यामुळे शाखा लावण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागे. प्रचारकांसह गावातील स्वयंसेवकही लपुन छपुन संघकार्य करत. शाखा लावत. संघाच्या गुप्त बैठका घ्याव्या लागत. ब-याच स्वयंसेवकांचे वडिल काँग्रेसी विचारांचे असल्यामुळे त्यांना संघाचं काम करताना फार विरोध होत असे. पण काही तरी बहाणे सांगुन तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी दहा दहा पंधरा पंधरा दिवस घराबाहेर राहुन संघ काम केलं. वातावरण संघानुकुल नसल्यामुळे  हळद्याहुन प्रचारक दिवसा येणे टाळत असत. त्यामुळे त्यांना रात्री बेरात्री प्रवास करावा लागे व सकाळी उजाडायच्या आत पुन्हा परत मुक्कामाच्या ठिकाणी जावे लागे.

सोयगांव तालुका सुरुवातीस जळगांव जिल्ह्यास (संघदृष्ट्या) जोडलेला असल्यामुळे शेंदुर्णीहुन डिगंबर बारी हे सोयगांवला कधी पायी तर कधी बैलगाडीत प्रवास करत येत असत व शाखा लावत असत. डिगंबर बारी आज हयात नाहीत. पण त्यांच्या जुन्या आठवणी ऐकताना अंगावर शहारे आल्याविना राहत नाही. शेंदुर्णीच्या उत्तम थोरातांनीही सोयगांवला प्रवास केले आहेत. एकदा प्रवास करताना डिगंबर बारी व उत्तम थोरात वादळी पावसात सापडले होते. दोघेही शेंदुर्णीहुन पायी निघाले होते. पावसात अंग भिजले होते. तरीही त्यांनी सोयगांव गाठलेच. पण अर्ध्या वाटेतुन परत फिरले नाही. सोयगांवला येऊन दोघांनीच संघस्थानावर प्रार्थना म्हंटली व ध्वजप्रणाम घेतला. नंतर एका पत्र्याच्या शेडखाली त्यांनी आसरा घेतला होता. थंडीने कुडकुडत होते. पावसात प्रचंड भिजलेल्या त्या दोन बालकांकडे पाहुन आमखेड्यातील एका हाॅटेलवाल्याला दया आली. त्याने दोघांना बोलावुन विचारपुस केली. ते दोघे संघाचे स्वयंसेवक आहे म्हंटल्यावर त्या हाॅटेलमालकाला धक्काच बसला. एवढ्या पावसात शेंदुर्णीहून फक्त शाखा लावायला हे दोघेजण आले याचे त्याला आश्चर्य वाटले. त्याने दोघा बालकांना चहा दिला व लवकर निसटायला सांगितले. त्या हाॅटेलमालकाच्या डोळ्यातील त्या दोघी संघ स्वयंसेवकाकडे बघताना अभिमानाने आलेली चमक मात्र त्यांचा प्रवास सार्थकी करुन गेली. संघाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलला तो याचमुळे. हा अनुभव स्वत: उत्तमजींनी एकदा वार्तालाभ होत असताना सांगितला होता. तेव्हाच डोळे पाणावले होते.

आजही आम्हा स्वयंसेवकांना जुन्या आठवणी व किस्से ऐकायला मिळतात. या आठवणी आमच्यातील पेटलेल्या संघसेवेच्या नंदादीपास निरंतर तेवत ठेवतात. कारसेवेच्या वेळी गावातील निघालेले व आणीबाणीच्या काळात जेरबंद झालेले अनेक कार्यकरत्यांचे अनुभव ऐकताना ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. मागील चाळीस पन्नास वर्षात सोयगांवात संघाचे काम खूप वाढले. आज घराघरात स्वयंसेवक दिसतात, ते तेव्हाच्या स्वयंसेवकांनी घेतलेल्या अपार मेहनतीमुळेच. सर्व आठवणी कागदावर उतरवायच्या झाल्या, तर वेळ अपुरा पडेल इतक्या आठवणी आहेत. संघसरिता या स्मृती ग्रंथातील सोयगांवच्या आठवणी वाचताना आज ज्या वरीष्ठ स्वयंसेवकांसोबत काम करतो त्या राजु फुसे, बबन चौधरी, आत्मारामजी बावीस्कर, सुनिल गावंडे, आनंदा इंगळे सर, योगेश मानकर, योगेश सोन्ने, बंडू भाऊ व वैकुंठवासी भूषणदादा मिसाळ या सगळ्यांचे नाव वाचुन त्यांच्याविषयी मनातील आदरभाव अजुन शतपट वाढला आहे. कालच रामभाऊ पठाडे यांच्याघरी प्रचारकांसोबत प्रवास झाला. त्यांच्याकडून ब-याच आठवणी ऐकायला मिळाल्या. कधी अप्पा कापरे व शांताराम अण्णा यांच्याकडूनही आठवणी ऐकायला मिळतात. ही सर्व मंडळी आज पासष्टी ओलांडलेली आहे. पण त्यांनी जेव्हा त्या बिकट परिस्थितीत संघकार्य सुरु केलं तेव्हा त्यांचे वय वीसच्या आतचे होते. त्यामुळे त्या सर्व स्वयंसेवकांच्या त्यागाची व हिमतीची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच. नाही का?

पन्नास वर्षापुर्वी सुरु झालेल्या शाखेवरील स्वयंसेवक काळानुसार बदलले. ते गेले दुसरे आले. कधी कमी झाले तर कधी वाढले. एवढेच काय तर संघाचा गणवेशही बदलला. पण संघस्थानावरील भगवा तसाच डौलात फडफडताना दिसतो व 'नमस्ते सदा वत्सले' या प्रार्थनेचे स्वर अजुनही वातावरणात त्यात लयबद्धतेत घुमतात. अजुनही भारतमातेचा जय घोष तितक्याच जोशपुर्ण आवाजात निनादत असतो...आणि स्वयंसेवकांच्या पावलांची मातीवर उमटलेली रांगोळी संध्याकाळच्या शांत शितल वातावरणात मातृभूचा साज श्रृंगार केल्यागत भासतात.

-कल्पेश गजानन जोशी
Lekhamrut.blogspot.com