जगभरात हिंदू धर्माचा प्रभाव वाढतोय- रवीजी अय्यर
१६ फेब्रुवारी, जळगांव: शनिवार रोजी जळगांवातील छ. संभाजी महाराज नाट्यगृहात 'हिंदूत्वाचा जगभरातील वाढता प्रभाव' या विषयावर रविकुमार अय्यर यांचे बौद्धिक ऐकण्याचा योग जळगांवकरांना आला. रविकुमार मागील काही वर्षापासुन जगभर हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीसंबंधी भ्रमंती करत आहेत. तसेच जनजाती समाजातही त्यांनी काही वर्ष सेवाकार्य केले असुन सध्या रा.स्व. संघाच्या केंद्रिय संपर्क मंडळातील ते सदस्य आहेत. या कार्यक्रमप्रसंगी त्यांचे 'इंडोनेशियातील हिंदुत्वाचे पुनरुत्थान' नामक पुस्तकाचे महेश त्रिपाठी यांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले. सवलतीच्या दरात ते पुस्तक उपलब्ध करण्यात आले होते.
रविकुमार यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत केली. शिवरायांनी नेताजी पालकरांना स्वधर्मात पुन: घेऊन हिंदूंना शुद्धीबंदीच्या जोखडातून मुक्त केल्याचे त्यांनी म्हंटले. त्यामुळे हिंदू समाजावर शिवरायांचे अनंत उपकार आहेत व त्यांच्या या विचारांना आपण विसरता कामा नये असेही ते म्हणाले.
तसेच, मुळ विषयास सुरुवात करण्यापुर्वी जळगांव व खान्देशच्या वैशिष्ट्य असलेल्या सुवर्ण व्यापार व केळी उत्पादनाचा उल्लेख करत खान्देशचे खरे रत्न कवयित्री बहिणाबाई चौधरी आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. जळगांवच्या महापौर सौ. सिमा भोळे यांनी बहिणाबाईंविषयक एक पुस्तक भेट म्हणुन दिले, ते वाचुन बहिणाबाईंच्या कार्याचा खरोखर अभिमान वाटला. जळगांवच्या विद्यापीठाला त्यांचे नाव देऊन ख-या अर्थाने एका महिलेचा गौरव केला गेला असल्याचे ते म्हणाले. विद्यापीठास महिलांचे नाव फक्त आपल्या भारतातच दिसू शकते. अन्य कोणत्याही देशात महिलेच्या नावाने विद्यापीठे नाहीत. त्यामुळे भारतातील स्त्रीसन्मानाचा आपणांस सार्थ अभिमान वाटतो असे ते यावेळी म्हणाले.
पुलवामा हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त करत ही घटना जरी सर्व भारतीयांसाठी दुखद असली तरी भारत महासत्ता होण्याकडे वेगाने पुढे जात आहे. भारताची पाकिस्तान व चीन सोबत युद्धे झाली आहेत. पण तत्कालीन परिस्थितीत आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत प्रभावी ठरत नव्हता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकिय दबावामुळे अनेकदा भारताला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आहे. १९७१ च्या युद्धात अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी पानबुडी पाठवली होती. आज तोच अमेरिका पाकिस्तानच्या विरोधात व भारताच्या बाजूने उभा दिसत आहे. पुलवामा हल्ल्यापश्चात अमेरिकेसह रशिया व इस्त्राईलने भारताला पाठिंबा दर्शवलाय हे देशाच्या प्रगतीचे व वाढत्या शक्तीचे सुचिन्ह म्हंटले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
भारतावर मागील हजारो वर्षापासुन अनेक परकियांनी आक्रमण केले. अनेक परकिय भारतात आले व इथेच स्थायिक होऊन भारतीय संस्कृतीत मिसळून गेले. हिंदू संस्कृतीने त्यांना मोठ्या मनाने स्विकारले. परंतु इस्लामीक आक्रमणाबाबत असे घडले नाही. त्यामुळेच सिंध इस्लाममय होऊन गेला. त्यामुळे हिंदूंचे पुनरुत्थान होण्यासाठी त्या त्या प्रदेशातील परधर्मात गेलेल्यांना आपल्या स्वत्वाची भावना जागृत करुन द्यावी लागेल व मोठ्या मनाने त्यांना स्विकारावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
आपल्या देशाचे बौद्धीक वैभव परकियांनी चोरुन आपल्या नावावर खपवल्याचा दाखला देत त्यांनी लिनक्स व न्युटनच्या 'कॅलकुलस'च्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की काही वर्षापुर्वी न्युटन व लिनक्स यांच्यात कॅलकुलसच्या शोधावरुन वाद सुरु होता. लिनक्सच्या मृत्युनंतर न्युटनने ते आपल्या नावे केले. परंतु त्या दोघांच्याआधी कॅलक्युलसची निर्मिती कोणी केली हे कधी बाहेर आले नाही. त्याची निर्मिती आपल्या मराठवाड्यातील गणितज्ञ भास्कराचार्यांनी केली होती, असे त्यांनी सांगितले. तसेच ब्रम्हेंद्रस्वामी 'फादर आॅफ कोआॅपरेटीव्ह मोमेंट' तर सारंगदेव संगितक्षेत्रातील महान तज्ञ असुन आपणांस त्यांच्या अलौकीक कार्याविषयी माहिती असली पाहिजे असे ते म्हणाले.
हिंदुत्वाविषयी बोलताना रविकुमारजी पुढे म्हणाले, आज जगभरात भारत व हिंदूत्वाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे व लोक वेगाने हिंदू धर्माकडे आकर्षित होत आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी अबुधाबीत हिंदू मंदिराचा शिलान्यास केला असुन त्यासाठी तेथिल मुस्लीम युवराज पुढाकार घेतो, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. पु. मुरारी बापु अबुधाबीत गेले तेव्हा तेथिल युवराजाच्या पत्नीने रामायण ग्रंथास आपल्या डोक्यावर ठेवून सभामंडपापर्यंत घेऊन गेल्या. तसेच तेथिल युवराजांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'जय सिया राम' म्हणुन केली होती याची आठवण त्यांनी यानेळी करुन दिली. त्यामुळे या उदाहरणांनरुन आपल्या लक्षात येईल की जगभरात हिंदूत्वाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. लोक धर्मांधता व कट्टरतापासून दूर जात आहे. लोकांना हिंदू धर्माचे व गीतेचे तत्वज्ञान जास्त तर्कशुद्ध व योग्य वाटत असल्यामुळे तसेच कट्टरतेच्या बेड्या नसल्यामुळे सर्व मानव जातीस आपला मानणारा व 'वसुधैव कुटुंबकम' असा मंत्र देणारा हिंदू धर्म आपलासा वाटू लागला आहे. रशियात आजपर्यंत ५ लाख लोकांनी हिंदू धर्म स्विकारला असुन त्यांना स्विकारण्यासाठी व त्यांच्या स्वागतासाठी आपण सज्ज असले पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
इंडोनेशिया हा मुस्लीम देश असुनही तेथिल लोकांचा श्रीराम व रामायणावर प्रचंड विश्वास आहे. तेथिल लोक श्रीरामाची पुजा करतात. त्यांच्या चलनावर गणपतीचे चित्र असुन संस्कृत भाषेतील काही अक्षरे त्यांच्या चलनावर छापली असल्याचे त्यांनी सांगितले. जावा द्वीपावरही अशीच परिस्थिती आहे. आॅस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका, इंडोनेशिया, जावा, रशिया इ. देशामध्ये हिंदू संस्कृतीचा स्विकार वेगाने होत असून त्यांना आपल्यात सामावुन घेण्यासाठी आपण उदार अंत:करणाने त्यांचे स्वागत करण्याची वेळ आली आहे.
पुढील १५ ते २० वर्षात हेच प्रमाण अजुन वाढलेले असेल, त्यामुळे ही आपणा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. असे सांगुन त्यांनी आपल्या वाणीस विराम दिला.
हिंदू धर्माचा जगभरातील वाढता प्रभाव ऐकुन श्रोत्यांच्या चेह-यावर आनंद ओसांडून वाहत होता. हजारोंच्या संख्येने जळगांवकर या कार्यक्रमास उपस्थित होते.
©️कल्पेश जोशी
lekhamrut.blogspot.com
lekhamrut.blogspot.com